काही दिवसांपासून कवी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं असतं’ या कवितेवर चांगलाच वाद सुरू झाला आहे. ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात यावी यासाठी अनेक संघटनांनी आंदोलनं केली. अखेर मुंबई विद्यापीठाने ही कविता अभ्यसक्रमातून वगळली आहे. यानंतर आता दिनकर मनवर यांनी एक निवेदन जाहीर केलं आहे. या निवेदनात विद्यापीठाने पूर्ण कविता संग्रहच अभ्यासक्रमातून वगळावा, अशी विनंती केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
कवी दिनकर मनवर यांची ‘पाणी कसं असतं’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या पदवी शिक्षणातील मराठी तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात घेण्यात आली होती. ही कविता मनवर यांच्या ‘दृष्य नसलेल्या दृष्यात’ या कविता संग्रहातून घेतली गेली आहे. या कवितेमध्ये आदिवासी स्त्रीयांवर आक्षेपार्ह शब्दांत लिहिले असल्याची टीका काही संघटनांनी केली होती. ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी अशी मागणी या संघटनांनी केली होती. यासाठी या संघटनांनी आंदोलन केले. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने अखेर या कवितेला अभ्यासक्रमातून वगळले आहे. यानंतर आता कवी दिनकर मनवर यांनी एक निवेदन जाहीर केले आहे.
लोकांनी कवितेचा चुकीचा अर्थ घेतला – मनवर
माझ्या कवितेचा अर्थ चुकीचा घेतला जात असून, तो मला कवी म्हणून काय माणूस म्हणूनही अभिप्रेत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे फक्त ‘पाणी कसं असतं’ ही कविता न वगळता त्यांचा पूर्ण कविता संग्रहच वगळावा अशी विनंती त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. त्याचबरोबर आपल्या कवितेमुळे लोकांना त्रास झाला, म्हणून त्यांनी माफी देखील मागितली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकारणाविषयी खूप चर्चा रंगताना दिसत आहे. कुणी मनवर यांची बाजू योग्य म्हणत आहे. तर कुणी मनवर यांचे समर्थन करणाऱ्यांशी वाद घालत आहेत.