संभाजी भिडे यांनी नाशिक येथे आंब्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये आता राज ठाकरेंनीही उडी घेतली आहे. ‘कोकणात गेल्यावर यावेळी आंबा कसा येणार असं विचारल्यावर कोकणी माणूस म्हणतो मोहोर जळाला ओ. मोहोर जळाला तर आंबा येतो कुठून? असा प्रश्न मला नेहमी पडतो. मात्र आज आंबा हा विषय टाळतो कारण अपत्यांची आपत्ती माझ्यावर नको’, अशी कोपरखळी मारत राज ठाकरे यांनी भिंडे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. आज मुलुंड येथे ९८ व्या अखिल भारतीय नाटयसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यंगचित्राच्या माध्यमातूनही टीका
नाट्यसंमेलात आपल्या भाषणादरम्यान सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्यंगचित्राचाही उल्लेख राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, माझ्या व्यंगचित्रात एक बाई एका लहान मुलाला घेऊन उभी आहे. त्या मुलाला आंब्याचा चेहरा दिलाय. त्यामुळे दुसरी बाई पहिल्या बाईला विचारते भिडेंच्या बागेतला का? या व्यंगचित्राचा उल्लेख करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
#Proindustrialist #LateralBabus #NarendraModi #AmitShah #bhideguruji #Mangoforinfertility
Posted by Raj Thackeray on Wednesday, 13 June 2018
जागतिक दर्जाची कलाकृती मराठी नाटकात उतरवा
आजच्या मराठी नाटकाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आजच्या सोहळ्याचा स्टेज भव्य असा केला आहे, मग नाटकाचं नैपथ्य का भव्य केले जात नाही? इंटरनेटमुळे आजच्या युवकांना जगभरातील कलाकृती पाहता येत आहे. त्यामुळे अशा भव्य कलाकृतीचे प्रतिबिंब कुठेतरी नाटकात दिसायला हवे. नाहीतर नवी पिढी नाटकांपासून आणखी लांब जात राहिल. तसेच नाटकांचा दर्जा चांगला असेल तर तिकिटांचे दर वाढवले तरी चालतील. हिंदीतले मोगले आझम नाटक पाहायला लोक पाच हजारांचे तिकिट काढून जातात. त्या प्रकारची भव्यता मराठी नाटकात आली पाहीजे.