राज्यातील निवासी डॉक्टरांसाठी खूशखबर आहे. लवकरच, राज्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांना ५ हजार वाढीव विद्यावेतन मिळणार आहे. आतापर्यंत निवासी डॉक्टरांनी त्यांच्या अनेक मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. आंदोलनानंतर आश्वासन मिळतं. पण, परिस्थिती मात्र जैसे थे राहते. पण, सरकारने आता विद्यावेतन वाढ निश्चित केली असून लवकरच त्याच्यावर अंमलबजावणी होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
“ऑगस्ट २०१८ मध्ये ही वाढ घोषित करण्यात आली होती. पण, त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नव्हता. पण, आता ही वाढ निश्चित झाली असून पुढच्या दोन दिवसांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. किमान पुढच्या ५ महिन्यांत ही वाढ अंमलात येईल. ७व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला जाईल. प्रसूती रजा आणि टीबी रजा जीआर लवकरच येणार आहे.” असं केंद्रीय मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी सांगितलं आहे.
निवासी डॉक्टरांनाही विद्यावेतन
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांनी वेळेवर विद्यावेतन मिळावे यासाठी वेगवेगळी आंदोलनं केली आहेत. त्यानुसार, राज्यातील चार सरकारी मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांना लवकरच विद्यावेतन मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील चार सरकारी मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांना स्टायपेंड मिळणार आहे. डॉक्टरांना स्टायपेंड देण्यासाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाला पैसे ट्रान्सफर केले आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे, निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे.
राज्य सरकारच्या वित्त विभागाने डॉक्टरांना स्टायपेंड देण्यासाठी १०० कोटी रुपये डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात हे पैसे देणार आहे.
राज्यातील लातूर, नागपूर, आंबेजागाई आणि औरंगाबाद या चार सरकारी मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांना स्टायपेंड मिळाला नव्हता. त्यामुळे, डॉक्टरांनी हाताला काळी फित बांधून निषेध नोंदवला. त्यासोबतच डॉक्टरांनी फळ विक्रीचा स्टॉल लावत अनोखं आंदोलन केलं. तसंच कामबंदचा इशाराही दिला होता. पण, त्याआधीच सरकारने आंदोलनाची दखल घेतली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना ५ हजार वाढीव विद्यावेतन मिळणार आहे.