आज सकाळपासून उल्हासनगरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे येथील उच्चभ्रू वसाहती-बाजारपेठा पाण्यात गेल्या असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे घरातील सामानांचे विशेषतः फर्निचरचे नुकसान झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी,अग्निशमन विभाग, आपात्कालीन विभाग या यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
उच्चभ्रू वस्ती पाण्याखाली
नेहरू चौक, हनिमून कॉटेज, रिजेंसी मैरेज हॉल, वूडलॅन्ड कॉम्प्लेक्स, गोल्डन पार्क, कुमार डिपार्टमेंट, मध्यवर्ती शासकीय हॉस्पिटल रोड, गोल मैदान, लिंक रोड, अमन टॉकीज रोड, सपना गार्डन हे उच्चभ्रू परिसर व येथील बाजारपेठा जलमय झाल्या. येथील रस्त्यांवर पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. गणेश शिंपी, अजित गोवारी, दत्तात्रय जाधव, भगवान कुमावत, विनोद केणे, एकनाथ पवार, बाळू नेटके, भास्कर मिरपगार या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करत होते. शेवटी फर्निचर बाजारात एक मोठे छिद्र करून पाण्याचा निचरा करण्यात आला. यावेळी येथील वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहतूक खोळंबली होती.
उल्हासनगरमध्ये ७८ मिमी पावसाची नोंद
उल्हासनगरमध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. सायं. ४.३० वाजेपर्यंत ७८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार विजय वाकोडे यांनी दिली. तलाठ्यांद्वारे वित्तहानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याचे विजय वाकोडे यांनी सांगितले.