विधीमंडळा अधिवेशनात विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर नेहमीच भ्रष्टाचाराचे मुद्दे काढून तुटून पडत असतात. कागद भिरकावत माझ्याकडे पुरावे आहेत, अमुक तमूक यांना जेलमध्ये टाका…. अशा वल्गना करताना आपण पाहीले असेलच. पण सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करत यांना तुरुंगात टाका, अशी मागणी केली. विरोधकांकडून नियम २९२ अन्वये उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारवर टीका करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देताना भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आघाडी सरकारमध्ये दीर्घकाळ अर्थमंत्री असलेल्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधकांचा प्रस्ताव फेटाळून लावला.
या लोकांनी ५० वर्ष देशाला लुटून खाल्ले आणि आता आम्हाला पाच वर्षांचा हिशोब विचारत आहेत. टिंगल टवाळ्या करण्यापेक्षा माजी अर्थमंत्र्यांनी आजपर्यंत सभागृहात काय केले? माजी अर्थमंत्री यांनी लॉटरीचा महाघोटाळा करून अडीच लाख कोटीचा व्यवहार परराज्यात नेला. एक अंकी लॉटरी चालवायची नाही, असा कायदा असताना एक अंकी लॉटरी चालवली गेली. विधानसभेत उत्तर देताना त्यांनी फक्त एक अंकी लॉटरीचे ५० ड्रॉ काढले असल्याचे सांगितले. मात्र तीन हजार ड्रॉ रोज चालायचे, असे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात केला.
विरोधक जेव्हा सत्ताधारी होते, तेव्हा त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा नीट करण्याऐवजी स्वतःच्या खासगी संस्था उभ्या केल्या. आज ग्रामीण भागातील लोक जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलांना टाकत नाहीयेत. जिल्हा परिषदेत असलेले शिक्षकच आपल्या मुलांना खासगी संस्थेत टाकत आहेत. आम्ही भ्रष्टाचार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतोय. याआधी सर्व व्यवहार रोखीने होत होता. आम्ही सर्व ऑनलाईन कारभार आणला. त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसा जात आहे. त्यामुळे विरोधक सैरभेर झाले आहेत. म्हणूनच आता आमच्यावर टीका करून जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप बंब यांनी केला.