अटाळी आंबिवली टिटवाळा या भागातील रिंगरूट बाधितांनी पुर्नवसन करण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी रिपाइंच्या नेतृत्वाखाली केडीएमसीवर धडक देत मार्चा काढला. शिष्टमंडळाने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली, यावेळी आयुक्तांनी जमीन मालकांशी टीडीआर संदर्भात चर्चा करून रहिवाशांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील अटाळी-आंबिवली, टिटवाळा या भागातून जाणार्या नियोजित बाह्यवळण (रिंग रूट) रस्त्यामध्ये सुमारे 845 घरे बाधीत होत आहे. बाधितांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी पालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार-निवेदने देत, प्रत्यक्ष भेटून चर्चा करूनही पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याने बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनांचे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, अण्णा रोकडे, महेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक भीमराव डोळस, रिपाईचे वॉर्ड अध्यक्ष जालिंदर बर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
अटाळी, आंबिवली, टिटवाळा येथून 35 ते 45 मीटर रुंदीच्या नियोजित बाह्यवळण रस्त्यामध्ये सुमारे साडेआठशे घरे बाधित होत आहेत. परिणामी त्यामध्ये राहणारे सर्वसामान्य गरीब कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. या बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना एफएसआय देण्यात यावा, तसेच महापालिका क्षेत्रातील खाजगी जागेवर एलआयजी व इडब्ल्यूएस प्रकारची घरे बांधून त्यामध्ये त्यांचे पुनर्वसन करावे. त्यानंतरच सदरची रिंगरूट रस्त्यासाठी लागणारी जागा रिकामी करावी अशी मागणी करण्यात आली होती. मोर्च्यात अटाळी-आंबिवली रिंगरूट बाधित रहिवाशी आपल्या कुटुंबियांसह सहभागी झाले होते.