मुंबईत इमारती, उच्चभ्रू वसाहतीत राहणार्या रहिवाशांमधील प्रतिकारशक्ती ही चाळी-झोपडपट्टीत राहणार्या रहिवाशांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने मुंबईकरांची प्रतिकारशक्ती तपासण्यासाठी हाती घेतलेल्या सेरो सर्वेक्षणातून या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब झाले आहे. इमारती, उच्चभ्रू वसाहतीत राहणार्या लोकांच्या खानपानाच्या सवयी त्यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. हे उच्चभ्रू लोक जंक फूडचे जास्त सेवन करतात. याउलट गरीब, झोपडीत राहणारे मुंबईकर भाजी, चपाती, भात हे घरी शिजवलेले अन्न खात असल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याचे आढळून आले आहे.
पालिकेने घेतलेला सेरो सर्वेक्षण अहवाल पाहिल्यास, त्यात चाळ-झोपडपट्टीधारकांमध्ये अँटिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण ४५ ते ५७ टक्के आहे. तर, इमारतींत राहणार्या रहिवाशांमध्ये हे प्रमाण १६ ते २१ टक्के इतकेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना प्रसार आणि प्रतिकारशक्ती तपासण्या यांचा आढावा सेरो सर्वेक्षणात घेतला. त्या सेरो सर्वेक्षणातील दोन टप्पे पूर्ण झाले आहेत.
तिसर्या टप्प्याची प्रक्रिया सुरू असून त्यातील निष्कर्ष एकूण प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे संकेत देत आहेत. तिसर्या टप्प्यातील पहिल्या भागाच्या अहवालातही चाळ-झोपडीधारकांमधील प्रतिकारशक्ती चांगली असल्याचे आढळून आल्याचे पालिकेच्या ज्येष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले. या सेरो सर्वेक्षणात विविध भागांतील १२ हजार मुंबईकरांना सामावून घेण्यात आले आहे. त्यातील पहिल्या भागातील ६ हजार नमुन्यांच्या अहवालातून अँटिबॉडीजमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.