मनोर: महावितरण कंपनीमार्फत जिल्ह्यातील अधिक भार वाहणार्या उपकेंद्रांच्या विभाजनाच्या प्रस्तावानुसार पालघर जिल्ह्यात दहा नवीन उपकेंद्रे निर्माण केली जाणार आहेत. मंजुरी निश्चित असल्याचे धरून महावितरण कंपनीच्या स्थापत्य विभागामार्फत उपकेंद्र निर्मितीसाठी निश्चित केलेल्या जागा मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ग्रामीण भागात पुरेशा दाबात वीजपुरवठा होत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती.नवीन उपकेंद्रांमुळे विजवाहिन्यांचे अंतर कमी होणार असून विजवाहिन्यांमधील बिघाडांची संख्या घटणार आहे.अखंडित वीजपुरवठ्याच्या शक्यता निर्माण झाल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पालघर शहराच्या पूर्वेकडील नवली भागातील भोगोला पाडा,मनोर लगतच्या नेटाळी,सातीवली,भोपोली,औद्योगिक वसाहती लगत वृंदावन एमआयडीसी, बेटेगाव,नागझरी,सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील वेढी,जव्हार तालुक्यातील जामसर आणि विक्रमगड तालुक्यातील देहरजे येथे नवीन उपकेंद्रे निर्माण केली जाणार आहेत.उपकेंद्रांच्या निर्मितीसाठी महावितरण कंपनीच्या आरडीएस योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.पालघर जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या विजवितरणाचे जाळे जुनाट झाले आहे.लोकसंख्या वाढीसह उद्योग वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आहे,त्यामुळे अनेक उपकेंद्रे ओव्हरलोड क्षमतेने कार्यरत आहेत. उपकेंद्रांपासून प्रत्यक्ष वीज ग्राहकांपर्यंत वीजपुरवठा करणार्या फिडरच्या विजवाहिन्यांमधील अंतर लांबचे असल्याने तांत्रिक बिघाडांच्या संख्येत वाढ होऊन विजेचा लपंडाव होत होता.अनियमित वीज पुरवठ्यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यवसायिक वीज ग्राहकांचे मोठे नुकसान होत असल्याने ग्रामीण भागातील वीज वितरणाच्या जाळ्यात बदल करण्याची मागणी केली जात होती.