पालघर: जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची रासायनिक पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे 1806 स्त्रोत तसेच शाळा व अंगणवाडीतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी दिले आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळले की गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण करून प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते. म्हणूनच जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी येत्या 30 जून 2023 पर्यंत पूर्ण करून घ्यायच्या आहेत.
त्यांची नोंद पाणी गुणवत्तेच्या पोर्टलवर करण्यासाठी पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळजोडणी असलेली कुटूंबे आदी स्त्रोतांचे पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी गोळा करून पाणी नमुने पाणी गुणवत्ता पोर्टलवर युआयडी नंबर टाकूनच संबधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात येणार आहेत. पाणी गुणवत्ता तपासणी अभियानासाठी ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी आणि आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी सनियंत्रण अधिकारी म्हणून अभियान कालावधीत काम पाहणार आहेत. पावसाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींनी उपाययोजनांचे काटेकार पालन करावे. तसेच पाणी शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रावर 33 टक्के क्लोरीन असलेल्या ब्लिचिंग पावडरचा तीन महिने पुरेल एवढा साठी उपलब्ध ठेवावा. ग्रामस्थांमध्ये शुद्ध व दूषित पाण्याबद्दल जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.