मोखाडा: राज्यात लंपी आजाराने धुमाकूळ घातला असताना मोखाड्यातील एका गरीब आदिवासी शेतकर्याच्या बैलाचा मृत्यू झाल्याने भीती व्यक्त केली जात आहे. परंतु याबाबत मोखाडा तालुका पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी सचिन भालची यांना विचारले असता सदरच्या बैलाचा मृत्यू लंपी आजाराने नव्हे तर वातावरणातील बदलामुळे न्यूमोनियामुळे ओढवला असल्याचे सांगितले. मोखाडा तालुक्यातील पिंपळपाडा येथील हिरामण गंगा भुसारे या शेतकर्याच्या बैलाचा मृत्यू झाल्याची घटना 24 तारखेला घडली आहे.गेल्या दहा दिवसापासून हा बैल ताप ,सर्दी या आजराने त्रस्त होता. तसेच यावेळी त्यांनी अनेक वेळा पशुधन पर्यवेक्षक मृत्यूंजय साळुंखे व परमेश्वर पोटे यांना वारंवार कॉल केला . त्यांनी शेतकर्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. या अशा कारभारामुळे व वेळीच उपचार न केल्यामुळे माझ्या बैलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप शेतकरी हिरामण भुसारे यांनी केला असून कारवाईची मागणी केली आहे. तसेच घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने लवकरात लवकर मदतीचे मागणी केली आहे.परंतु, शेतकर्यांकडून करण्यात आलेले आरोप पशुवैद्यकीय अधिकार्यांनी फेटाळले आहेत.
मोखाडा तालुक्यात 21 हजार 700 गायी बैल पशुधन असून 5 हजार गायी बैलांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या गावात लगत असलेल्या तुळयाचा पाडा येथील एका पशुमध्ये लंपी आजाराचे लक्षणे आढळली होती. त्याचे नमुने आम्ही तपासणीसाठी पाठवले असल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. यामुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा बळी लंपी आजाराचा तर नसेल ना याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.