भाईंदर: भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे पोसा रुग्णालयाच्या वतीने २५ वे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल भाष्य केले.राजकारणात सध्या वेगळी परिस्थिती आहे. पूर्वी स्वतःच्या जाती बद्दल अभिमान होता. परंतु आता इतर जातीबद्दल द्वेष निर्माण करण्याचे काम केले जात आहे. रक्तदान हे पुण्याचे काम आहे. एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात रक्त दिल्यानंतर ते रक्त कोणत्या जातीचे आहे हे माहीत नसते. आपण ज्या जातीचा द्वेष करत आहोत. त्या जातीचे रक्त दिले असेल तर आपण काय करणार आपण ते रक्त काढून फेकून देणार आहात का? मग इतर जातीचा द्वेष करणे योग्य आहे का? हा आपण विचार करणे आवश्यक आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून पोसा रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. हे अत्यंत पुण्याचे काम आहे. या रक्तदान शिबिराचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे असेच चांगले काम करत राहा असे पोसा कुटुंबियांना, रक्तदात्यांना व मीरा-भाईंदरकरांना ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज ठाकरे यांनी उत्तन वासीयांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मीरा- भाईंदरचे मनसेचे पदाधिकारी शहर अध्यक्ष हेमंत सावंत, विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे व संदीप राणे, उपशहर अध्यक्ष अभिनंदन चव्हाण, प्रकाश शेलार, गिरीश सोनी, रमाकांत माळी, विद्यार्थीसेना शहर अध्यक्ष रॉबर्ट डिसोझा, महिला शहर अध्यक्ष कविता वायंगणकर यांनी मीरा- भाईंदर शहरात राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन जागोजागी स्वागत केले.