विरार: विरार-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प उभारणीच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे किनार्यालगतचे कोळीवाडे व मच्छीमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे,अशा स्थानिकांच्या तक्रारी असून त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधाची धार अधिक तीव्र आली आहे. नुकताच अर्नाळा येथील बैठकीतही या प्रकल्पाबाबत विरोध दर्शवण्यात आला. तर उत्तन येथील समुद्र किनार्यावर सर्वेक्षणही बंद पाडत विरोध करण्यात आला आहे.वर्सोवा ते विरार असा सुमारे ४२.७५ किलोमीटरचा सागरी सेतू तयार करण्याचा प्रकल्प शासनाने नियोजित केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हा प्रकल्प तयार केला जाणार आहे.
या प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक स्तरावरून हळूहळू हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.नुकताच याबाबत एमएमआरडीएचे अधिकारी व मच्छिमार संघटना यांची विरार अर्नाळा येथे बैठक पार पडली. मात्र या प्रकल्पामुळे सागरी किनार्या लगत असलेले कोळीवाडे व व तेथील मच्छीमारांचा पारंपारिक व्यवसाय अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोधच आहे, असे येथील मच्छीमारांनी सांगितले आहे.