भाईंदर :- मिरारोडमधील पेनकर पाडा भागात ३० वर्षांपूर्वी एकाच कुटुंबियांतील एक महिला व तिच्या चार लेकरांची निर्घृण हत्या करणार्या आरोपींना मीरा -भाईंदरच्या काशीमिरा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर अटक केली आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशात आपले नाव बदलून बसलेल्या आरोपींना वेशभूषा बदलून उत्तरप्रदेश एस.टी. एफ. च्या मदतीने पकडत तीस वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर याच गुन्ह्यातील एका आरोपीला २९ डिसेंबर २०२२ साली मुंबई एअरपोर्ट येथे पकडण्यात आले होते.
काशिमिरा गुन्हे शाखा कक्ष- १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार यांच्या तपास पथकाने जून २०२१ मध्ये वाराणसी, उत्तरप्रदेश येथे २० दिवस वास्तव्य करून वाराणसीच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने तपास केला होता. त्यावेळेस आरोपीतांबाबत कोणतीही ठोस माहिती प्राप्त झाली नव्हती. सदर गुन्हयाचा आजपर्यंत सलग पाठपुरावा करून आरोपींची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. यावेळी आरोपी हे सोहनी, किराकत, जौनपूर या ठिकाणी स्वतःचे नाव बदलून कोणासही संशय येणार नाही अशा रितीने राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच त्यापैकी एक विजय नाव धारण केलेला आरोपी भूत बाधा उतरवून देणे, दारू सोडविणे इ. साठी अंगारा, भस्म, मंत्र लिहिलेला कागद देतो व त्याला लोक विजय महाराज ऊर्फ विजय बाबा असे संबोधतात अशी माहिती प्राप्त झाली. तसेच अनिल उर्फ विजय रामअवध उर्फ अवधु (वय ४८ वर्षे) आणि सुनिल ऊर्फ संजय रामअवध सरोज ( वय- ४७ वर्षे) दोन्ही आरोपींना उत्तरप्रदेश येथून ७ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले. २९ डिसेंबर २०२२ रोजी हत्याकांडातील आरोपी सावलाला ऊर्फ काल्या उर्फ साहेब उर्फ राजकुमार अमरनाथ चौहान, वय १९ वर्षे ( गुन्हा करतेवेळी वय), याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. सदरची कामगिरी ही गुन्हे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष -१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, प्रशांत गांगुर्डे व पुष्पराज सुर्वे, सहायक फौजदार राजु तांबे, संदीप शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन हुले, सचिन सावंत, समीर यादव, सुधीर खोत, विकास राजपूत, पो.अं. प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, स.फौ. संतोष चव्हाण यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
मिरारोडच्या पेनकर पाडा भागात आरोपींचे शेजार्यांशी ३ हजार आणि कपडे चोरी तसेच लहान मुले घरासमोर बसतात आणि खेळताना आरडाओरडा करतात या शुल्लक कारणावरून भांडण झाले.त्यानंतर १६ नोव्हेंबर १९९४ रोजी त्याचे रूपांतर रक्तरंजित निर्घृण हत्येत झाले.यावेळी पाच जणांची हत्या करण्यात आली होती. त्यात जगराणी देवी (वय २७ वर्ष), प्रमोद (५ वर्ष), पिंकी (साडेतीन वर्षे), चिंटू (२ वर्ष) आणि ३ महिन्याचे लहान मूल अशा पाच जणांची आरोपींनी निर्घृण हत्या करून ते पळून गेले होते.त्यानंतर मयत यांचा पती राज नायरायन याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.