मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे पतिदेव अजित पवार यांनी हैदोस घातल्याचे चित्र दिसते. अजित पवार हे उघडपणे या धमक्या देत असताना राज्याचा आणि देशाचा निवडणूक आयोग भाजपाची धुणीभांडी करीत बसला आहे काय? असा बोचरा सवाल ठाकरे गटाने केला आहे. (Lok Sabha Election 2024: Thackeray group targets ECI over Ajit Pawar’s threats)
अजित पवार हे मतदारांना उघड उघड धमक्या देऊ लागले आहेत. बायकोला मते दिली नाहीत तर, इंदापूरला पाणी मिळणार नाही, अशी धमकी त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिली आहे. बारामतीतील उद्योजक, लहान व्यापारी यांना अजित पवार यांनी धमकावले की, ‘‘जास्त उड्या माराल तर याद राखा. नाक दाबून तोंड कसे उघडायचे ते आपल्याला चांगले समजते,’’ याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून लक्ष वेधले आहे.
अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली
बारामती लोकसभा मतदारसंघातील स्टोन क्रशर, वाळू, रेती व्यापारी, छोटे बिल्डर यांना बोलावून या महाशयांनी (अजित पवार) दम भरला, ‘‘तुमच्या गावात माझ्या बायकोला मताधिक्य मिळाले नाही तर याद राखा. तुमचे उद्योगधंदे बंद करीन.’’ पवार यांनी शासकीय यंत्रणा हाताशी धरून यापैकी अनेक उद्योजकांना नोटिसा बजावून कोट्यवधींचा दंड आकारला. त्यामुळे हे उद्योग बंद पडले. ‘‘दंड कमी करून घ्यायचा असेल तर माझ्या बायकोचे काम करा. नाहीतर तुम्ही भिका मागा,’’ असे निर्लज्ज वर्तन अजित पवार करीत आहेत ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
सरोदे, विश्वंभर चौधरी, निखिल वागळेंनी पुढाकार घ्यावा
अजित पवार यांना एकतर नैराश्याने ग्रासले आहे किंवा दारुण पराभवाच्या भीतीने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा नवा डावही त्यांच्यावरच उलटला आहे. मते द्या, नाहीतर घरातील चुली विझविण्यापर्यंत अजित पवार यांचे वैफल्य शिगेला पोहोचले आहे, असे सांगतानाच ठाकरे गटाने म्हटले आहे की, बारामतीकरांनी आता निर्भय बनून ही झुंडशाही मोडून काढायला हवी. महाराष्ट्रात ऍड. असिम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी व पत्रकार निखिल वागळे हे ‘निर्भय बनो’ आंदोलनाचा एल्गार करीत आहेत. बारामतीकरांना धीर देण्याचे काम या तिघांनी प्रत्यक्ष बारामतीत जाऊन केले पाहिजे.