गेल्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. तापमानाचा पारा ३८ अंशापार झाला आहे. वाढणार्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या वाढत्या तापमानावर गारेगार माडक्यातील पाणी हे सर्वसामान्यांना दिलासा देणारे असते. प्रतिवर्षी अनेक माठ विक्रेते उन्हाळा सुरू झाला की माठ विक्रीसाठी घेऊन येतात. या वर्षीही माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजस्थानी माठांचे आगमन झाले असून ग्राहक हे माठ खरेदी करताना दिसत आहेत.
लहान-मोठया आकारात उपलब्ध असणारे हे माठ १२० ते १५० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. विशेष म्हणजे नळ लावलेले माठही उपलब्ध असून त्यासाठी ३० ते ५० रुपये जादा द्यावे लागत आहेत. राजस्थानवरून आणले जाणारे हे माठ एका वेळेस ३ हजार इतक्या प्रमाणात एका गाडीत आणले जातात. स्थानिक मडक्यांनाही बाजारात चांगली मागणी आहे. मात्र,आधुनिक जीवनशैलीमुळे कुंभार काम करणारे दुर्मिळ झाल्याने परराज्यातील माठ खरेदी करण्याशिवाय नागरिकांना पर्याय उपलब्ध नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोणतीच भाववाढ झाली नाही. गेल्यावर्षी लहान माठ १०० ते १२०० रुपयांपर्यंत मिळत होता. तर मोठे माठ २२० रुपयांपर्यंत उपलब्ध होते. नळ बसविलेल्या माठांना विशेष मागणी आहे. उन्हाळा वाढेल तशी माठाची विक्री वाढणार आहे. विशेष म्हणजे माठ विक्रीसाठी परप्रांतीय व्यापारी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात माठ विक्रीसाठी आम्ही घेऊन येतो. उन्हाळा वाढल्याने माठ विक्री वाढली आहे. राजस्थान वरून हे माठ आणले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी किमती वाढल्या नाहीत. किमती स्थिर आहेत. नळ असणार्या माठाला चांगली मागणी आहे.
– माठ विक्रेता