ग्रामीण भागातील घराच्या मागील बाजूस असलेल्या परसबागा या कुटुंबाला आधार असतात. वरंध गावातील एका महिलेने याच परसबागेला आधुनिक शेतीची जोड देत विविध भाज्यांचे उत्पादन घेत कुटुंबाला आधार निर्माण करून दिला आहे. महाड तालुक्यातील वरंध हे एक आदर्श गाव आहे. पडीक शेतीला या गावाने भुईमुग लागवडीतून हरित बनवले आहे. अशा वरंध गावातील एका महिलेने विविध भाज्यांची लागवड करत घरामागील परसबागेला देखील महत्व प्राप्त करून दिले आहे.
ग्रामीण भागातील घरांच्या मागील बाजूस परंपरागत घरातील माणसांना पुरेल अशा भाज्यांची लागवड केली जाई. घरातील न्हाणीघरातील पाणी या परसबागेत सोडले जाते. आणि या पाण्याच्या आधाराने या भाज्या वर्षभर पुरवल्या जातात. महाड तालुक्यातील वरंध गावातील एका महिलेने आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा आधार देत परसबाग फुलवण्याचे काम केले आहे. सौ.सारिका सुनील कोंडाळकर (वय ४३) या मुंबईमध्ये राहत होत्या मात्र लग्नानंतर वरंध गावात सासरवाडीच्या शेतीत रमल्या. शेतीचा अनुभव नसला तरी पती सुनील कोंडाळकर आणि सासू सासरे यांच्या शेतीतल्या मार्गदर्शनातून शेतीची आवड निर्माण झाल्याचे सारिका कोंडाळकर सांगतात.
उन्हाळ्यात परसबागेतील पाण्यावर तोंडली, भेंडी, आणि गवार काढली जाते. तोंडलीचा वेल मांडवावर पसरला असून मोठ्या प्रमाणात तोंडली काढली जातात. याच्याच जवळ अर्धा गुंठे परिसरात अळूच्या पानांची लागवड केली आहे. आज या अळूच्या पानांची बाग तयार झाली आहे. अळूच्या पानांना मोठी मागणी देखील आहे. ऐन पावसाळ्यात विविध सणासुदीला अळूची पाने आणि त्यातून तयार केलेल्या अळूच्या वड्यांना मागणी आहे. याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय देखील सारिका कोंडाळकर करतात. यातून महिना सात ते आठ हजार उत्पन्न मिळते.
कृषी विभागअंतर्गत ५० हापूस आंबा लागवड देखील करण्यात आली आहे. सारिका कोंडाळकर इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी गावातील महिलांना देखील प्रोत्साहित करण्यासाठी महिला बचत गटाची निर्मिती केली आहे. या सगळ्या माध्यमातून सारिका कोंडाळकर यांची यशस्वी वाटचाल सुरु असून परसबागेला आधुनिक शेतीची जोड देत कुटुंबाला आधार देत आहेत.