नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप स्पर्धेसाठी तयार केलेले नव्या ‘हायब्रिड मॉडेल’ पाकिस्तान क्रिकट बोर्डाने (PCB) तसेच भारतासह (India) सर्वच देशांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावानुसार आता आशिया कप दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 1 ते 17 सप्टेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. (Asia Cup 2023 : India-Pakistan match to be held; The Asia Cup will be played between two countries)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या नव्या प्रस्तावानुसार आशिया कपचे भारताचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आता स्पर्धेतील 13 पैकी चार किंवा पाच सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत, तर भारत-पाकिस्तानसह भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारताने अंतिम फेरी गाठल्यास अंतिम सामनाही श्रीलंकेतच होणार आहे, अशी ग्वाही पाकिस्तान बोर्डाने दिल्याचे समजते. या नव्या स्वरूपानुसार स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेने सादर केलेल्या ‘हायब्रिड मॉडेल’नुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशात खेळण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे यावर्षी विश्वचषकही भारतात होणार आहे, ज्यामध्ये पाकिस्तानही सहभागी आहे. याशिवाय 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही होणार आहे. त्यामुळे या नव्या हायब्रीड मॉडेलमुळे या सर्व स्पर्धांचे प्रश्न सुटतील असे दिसत आहे.
पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेचे दुसरे यजमान म्हणून संयुक्त अरब अमिराती (UAE) ला प्रस्तावित केले होते, परंतु बांगलादेशने सप्टेंबरमध्ये अतिउष्णतेमुळे याठिकाणी खेळण्यास आक्षेप घेतला होता. याचवेळी बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) ने ‘हायब्रिड मॉडेल’ला नकार दिला.
सहा देशांच्या आशिया कपसाठी भारताला पाकिस्तान आणि नेपाळसोबत एका गटात ठेवण्यात आले आहे. विश्वचषकापूर्वी तो आशिया कप 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. 13 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अंतिम फेरीसह एकूण 13 सामने होणार आहेत. 2022 प्रमाणे, दोन्ही गटातील अव्वल चार संघ सुपर फोरमध्ये जातील. सुपर फोरमधील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर त्यांच्यात किमान तीन सामने होण्याची शक्यता आहे.