भारत आणि इंग्लंड यांच्यात लवकरच चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून पहिले दोन सामने चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहेत. १३ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत आसनसंख्येच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (TNCA) दुसऱ्या कसोटीत ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिल्याची माहिती टीएनसीएच्या अधिकाऱ्याने सोमवारी दिली. ‘बीसीसीआय आणि टीएनसीएने योग्य ती खबरदारी घेत ५० टक्के प्रेक्षकांना दुसऱ्या कसोटीसाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे,’ असे टीएनसीएचा अधिकारी म्हणाला.
योग्य ती खबरदारी घेत प्रवेश
‘केंद्र सरकारने कोरोनासंदर्भातील नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यासाठी परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत आम्ही चर्चा केली. बीसीसीआय आणि टीएनसीएने योग्य ती खबरदारी घेत ५० टक्के प्रेक्षकांना दुसऱ्या कसोटीसाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे,’ असे टीएनसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.
२५ हजार प्रेक्षकांना प्रवेश
चिदंबरम स्टेडियमची ५० हजार आसनसंख्या आहे. मात्र, आता ५० टक्के प्रेक्षकांना म्हणजेच २५ हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहता येणार आहे. भारत-इंग्लंड मालिकेतील अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार असून तिथेही ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याची माहिती आहे.