भारतीय संघाने नुकतीच झालेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. पहिली कसोटी गमावल्यानंतर भारताने दमदार पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकले आणि चार सामन्यांच्या या मालिकेत ३-१ अशी बाजी मारली. भारताच्या या यशात अक्षर पटेल, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या युवा खेळाडूंचे कौतुक केले. शास्त्री स्वतः अष्टपैलू खेळाडू होते. त्यामुळे त्यांनी वॉशिंग्टन सुंदरची विशेष स्तुती केली. सुंदरने या मालिकेत तीन सामन्यांच्या चार डावांमध्ये १८१ धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. चौथ्या कसोटीत तो ९६ धावांवर नाबाद राहिला.
चौथ्या क्रमांकावर खेळला पाहिजे
भारतीय संघ अडचणीत असताना वॉशिंग्टन फलंदाजीला यायचा. त्यामुळे त्याच्यावर दडपण असायचे. परंतु, त्याने संयम राखून फलंदाजी केली. १९ वर्षांखालील वयोगटात तो सलामीवीर म्हणून खेळला आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना तो घाबरत नाही. त्याच्या इतकी प्रतिभा माझ्यात कधीही नव्हती. तामिळनाडूसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. मी याबाबत तामिळनाडूचे निवडकर्ते आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांच्याशी नक्कीच संवाद साधणार आहे, असे शास्त्री म्हणाले.
गोलंदाजीवरही लक्ष देणे गरजेचे
वॉशिंग्टनने गोलंदाजीवरही दुर्लक्ष करता कामा नये. त्याने गोलंदाजीवर अधिक लक्ष दिले. फलंदाजीत ५०-६० धावा करतानाच तो गोलंदाजीत २० षटके टाकू शकला, तर भारताला सहाव्या क्रमांकावर खेळू शकणारा चांगला अष्टपैलू लाभेल. मी खेळाडू असताना माझी हीच भूमिका होती आणि वॉशिंग्टन माझ्यापेक्षाही चांगली कामगिरी करू शकतो, असेही शास्त्री यांनी नमूद केले.