यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आतापर्यंत मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि चेन्नईचे एम. ए. चिदंबरम स्टेडियम या केवळ दोन मैदानांवर सामने झाले आहेत. मुंबईत संघ मोठ्या धावसंख्या उभारत असल्याचे पाहायला मिळाले आहे. चेन्नईत मात्र संथ खेळपट्टी असल्याने येथे होणाऱ्या सामन्यांत संघांना मोठ्या धावसंख्या उभारण्यात अपयश येत आहे. टी-२० क्रिकेटमध्ये चाहत्यांना आक्रमक फलंदाजी, मोठे फटके पाहायला आवडतात. त्यामुळे चेन्नईतील खेळपट्टीबाबत चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र, खेळपट्ट्यांबाबत तक्रार करणे योग्य नसल्याचे मत मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने व्यक्त केले.
सामने अधिक चुरशीचे
आयपीएलमध्ये केवळ फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या तयार करा, अशी मागणी करणे योग्य नाही. यंदा कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. प्रत्येक मैदानावर खेळताना तुम्हाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेतील सामने अधिक चुरशीचे होत आहेत. चेन्नईतील खेळपट्ट्या या संथ आहेत आणि धावा करणे सोपे नाही, हे खरे आहे. परंतु, मागील काही सामन्यांत संघ १५०-१६० धावा करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे खेळपट्ट्यांबाबत तक्रार करणे चुकीचे आहे, असे जयवर्धने म्हणाला.
फलंदाजी करणे अशक्य नाही
मुंबईने यंदा आपले तिन्ही सामने चेन्नईतच खेळले आहेत. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १५२ धावा, तर हैदराबादविरुद्ध १५० धावा यशस्वीरीत्या रोखल्या होत्या. मात्र, मोठ्या धावसंख्या होत नसल्यास तरी फलंदाजी करणे अगदीच अशक्य नसल्याचे जयवर्धनेने स्पष्ट केले. तसेच आम्ही या खेळपट्ट्यांशी जुळवून घेतले आहे, असेही तो म्हणाला.