इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होणार असून दोन्ही संघांचा हा या मैदानावरील अखेरचा सामना असणार आहे. गतविजेत्या मुंबईला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामन्यांत ते पराभूत झाले आहेत. खासकरून त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात फलंदाज त्यांच्या कामगिरीत सुधारणा करतील अशी मुंबईला आशा असेल.
रोहितने मोठी खेळी करणे गरजेचे
मुंबईला मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आक्रमक शैलीत फलंदाजी करताना ४४ धावांची खेळी केली होती. यंदा रोहितने चार पैकी तीन सामन्यांत ३० धावांचा टप्पा पार केला आहे. मात्र, त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे तो पंजाबविरुद्ध चांगली सुरुवात मिळाल्यास त्याचे अर्धशतक किंवा शतकात रूपांतर करेल अशी मुंबईला आशा असेल. तसेच मुंबईच्या मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे. यंदाच्या मोसमात हार्दिक पांड्याने (चार सामन्यांत ३५ धावा) निराशा केली आहे. मुंबईच्या गोलंदाजांना मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यश आले आहे.
गेल किंवा पूरनला वगळणार?
मुंबईप्रमाणेच पंजाबलाही फलंदाजांची चिंता आहे. कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांना कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे. त्यातच मधल्या फळीतील क्रिस गेल आणि निकोलस पूरन या वेस्ट इंडियन फलंदाजांना सूर गवसलेला नाही. त्यामुळे या सामन्यात या दोघांपैकी एकाला वगळून डाविड मलानला संधी देण्याचा पंजाब विचार करू शकेल. तसेच गोलंदाजीत मुरुगन अश्विनच्या जागी रवी बिष्णोईला या सामन्यात संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.