देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. सलग दुसऱ्या दिवशी ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आता एअरलिफ्टचा वापर करून राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्यात कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर या तिन्ही गोष्टींमध्ये तुटवडा भासत आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी राज्यातल्या लोकसंख्येच्या अनुषंगाने मिळाव्यात, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. अत्यंत संवादपूर्ण त्यांनी म्हणणं मांडलं आहे.’
पुढे टोपे म्हणाले की, ‘इतर राज्यातून येणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा उशीरा होतोय. विशाखापट्टणमची ट्रेन निघालेली जरूर आहे. पण यायला थोडा उशीर लागतोय. त्यामुळे आम्हाला एअरलिफ्टिंग करून मिळेल का? याबाबत अत्यंत सकारात्मक दृष्टीने निर्णय झाला की, आपापल्याला ज्या ज्या राज्यातून ऑक्सिजनचा कोटा मिळेल. त्या कोट्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी रिकामी टँकर्स एअरफोर्सच्या विमानातून घेऊन गेले जातील. येताना ते टँकर एकतर ट्रेनद्वारे आणले जातील किंवा जवळचे राज्य असेल तर रस्त्याच्या माध्यमातून आणले जातील. दरम्यान राज्यातील ऑक्सिजन वाहतुकीसाठी आणि गतीने आणण्यासाठी एअरफोर्सची मदत घेतली जाणार आहे.’
हेही वाचा – विरारची दुर्घटना राष्ट्रीय विषय नाही, राजेश टोपे यांचे बेजबाबदार वक्तव्य