इंग्लंडविरुद्ध पाच टेस्ट मॅचपैकी पहिली टेस्ट मॅच ३१ रन्सनं भारतानं गमावली. या मॅचमध्ये चेतेश्वर पुजाराला प्लेईंग इलेव्हन संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं विराट आणि टीम मॅनेजमेंच्या या निर्णयाबाबत क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी टीका केली होती. इतकंच नाही तर, सोशल मीडियावरदेखील पुजाराला बाहेर ठेवण्यात आल्याबद्दल चाहत्यांदेखील राग व्यक्त केला होता. आता दुसऱ्या टेस्ट मॅचला ९ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. त्यामुळं लॉर्ड्सवर चेतेश्वर पुजाराची हजेरी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या मॅचसाठी भारताचे माजी क्रिकेटर्स आणि दिग्गजांनी चेतेश्वर पुजाराला पसंती दिली आहे.
चेतेश्वर पुजारा भारताची संरक्षक भिंत
चेतेश्वर पुजारा नेहमीच टेस्ट मॅचमध्ये भारताची संरक्षक भिंत बनला आहे. दरम्यान इंग्लंड दौऱ्यात काही कालावधीपूर्वीच यॉर्कशायरकडूनदेखील पुजारा कौंटी क्रिकेट खेळला त्यामुळं त्याचा फायदा टेस्ट मॅचसाठी होऊ शकतो. त्यामुळं जेव्हा बॉल जास्त फिरकी मारत असतो तेव्हा चेतेश्वर पुजाराला टीममध्ये समाविष्ट करून घेणं ही चांगली कल्पना असल्याचं दिग्गज मोहिंदर अमरनाथ यांनी सांगितलं आहे. तर, पुजारा जरी फॉर्ममध्ये नसला तरीही क्रीजवर टिकून राहण्याची त्याच्यामध्ये क्षमता असल्याचंही अमरनाथ यांनी मत मांडलं आहे. तर लिटील मास्टर सुनील गावस्करानी अमरनाथ यांची री ओढली आहे. ‘पुजाराजवळ टेक्निक आणि धैर्य दोन्ही आहे, जे टेस्ट मॅचसाठी गरजेचं आहे. त्याचा खेळ हा पिचवर अवलंबून असेल, जर पिचवर हिरवळ नसेल तर उमेश यादवच्या जागी पुजाराला खेळवता येऊ शकतं.’ असं मत सुनील गावस्करांनी मांडलं आहे. वास्तविक मागच्या मॅचमध्ये शिखर धवन, के एल राहुल आणि अजिंक्य राहणे तिन्ही खेळाडू अयशस्वी ठरले होते. त्यामुळं आता दिग्गजांचं हे म्हणणं भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली किती मनावर घेतो हे लवकरच कळेल.