राजकोट : राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीमुळे भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आला. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात 2 बाद 207 धावा केल्या आहेत. 150 पेक्षा अधिक धावांनी भारताचा संघ या कसोटीत पुढे आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने 500 वी विकेट घेत हा पल्ला गाठणारा तो जगातील नववा आणि दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. परंतु, असे असतानाच आता अश्विनने या कसोटी सामन्यातून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. मेडिकल एमरजन्सीमुळे अश्विन अचानक घरी गेल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. (Ravichandran Ashwin pulls out of third Test against England)
हेही वाचा… IND vs ENG Test : बेन डकेटचे शतक, इंग्लंड दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 207 धावा
अश्विनने तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी माघार घेतल्याने आता केवळ 10 खेळाडूंसोबतच भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार आहे. तिसऱ्या कसोटीत भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना सर्वबाद 445 धावा केल्या. त्यात अश्विनने 37 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर गोलंदाजीला सुरुवात झाल्यानंतर त्यानेच भारताला जॅक क्रॉलीच्या रुपात पहिले यश मिळवून दिले. ज्यामुळे त्याला क्रॉलीमुळे 500 वी विकेट मिळाली आहे. मात्र रविचंद्रन अश्विनच्या कुटुंबात अचानक अडचण निर्माण झाल्यामुळे त्याला सामन्यात मधूनच बाहेर पडावे लागत आहे. बीसीसीआयने आपल्या एक्स अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली.
बीसीसीआयने आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, या कठीण परिस्थितीमध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि संघातील सर्व खेळाडू, सहकारी कर्मचारी रविचंद्रन अश्विनच्या पाठिशी आहेत. खेळाडूंच्या कुटुंबियांना आम्ही पाठिंबा देतो आणि त्यांचे आरोग्य आणि खुशाली आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. या आव्हानात्मक परिस्थितीतून अश्विन आणि कुटुंबिय बाहेर पडतील, अशी आशा करुयात, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयच्या संकेतस्थळावर दिली आहे.
रविचंद्रन अश्विन आता संघात नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघ केवळ चार गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. फिरकी आक्रमणाची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळतील. भारताला फक्त मैदानावर फिल्डिंगसाठी बदली खेळाडू मिळेल. अश्विन याने कौटुंबिक कारणांमुळे मैदान सोडले आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे त्याच्या जागी बदली खेळाडू टीम इंडियाला मिळणार नाही.