राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या. दरम्यान, कल्याण तालुक्यात असणाऱ्या २१ ग्रामपंचायतींमधील १६४ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे २० ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. झालेल्या मतदानाची मतमोजणी कल्याणमधील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात सोमवारी सकाळी पार पडली. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवारांबरोबर लढत होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत २० पैकी महाविकास आघाडीची ९ ठिकाणी वर्णी लागली तर भाजप पुरस्कृत उमेदवारांनी ११ ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळवले.
या निवडणुकीत खोणी ग्रामपंचायतीमध्ये मनसेने खाते उघडले आहे. तेथे मनसे पुरस्कृत चार उमेदवार निवडून आले आहेत. नडगाव-दानबाव ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तेथे अपक्ष उमेदवार शेखर लोणे व प्रमिला लोणे हे विजयी झाले आहेत. यासह घोटसईमधील नऊच्या नऊ जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. रायते आठ पैकी सेना आठ, भाजप एक, तर गोवेली-रेवतीमध्ये नऊपैकी सेना पाच, भाजपचे चार उमेदवार निवडून आले आहेत. राया-ओझर्लीमध्ये नऊपैकी शिवसेना-भाजप व इतरांना पाच तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. चिंचवली-उतणेमध्ये नऊच्या नऊ उमेदवार ग्रामविकास पॅनलचे विजयी झाले आहेत. बेहरे ग्रामपंचायतीत १७ पैकी सेना-राष्ट्रवादी १३, भाजप चार, गुरवलीत ग्रामविकास पॅनल पाच, अपक्ष चार, म्हस्कळ ग्रामविकास पॅनल प्रकाश भोईर पुरस्कृत पाच, भाजप दोन, सेना एक, इतर एक अशा प्रकारे उमेदवार विजयी झाले आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली असून विजयी उमेदवारांची आकडेवारी असली तरी सरपंचपदाचे आरक्षण पडल्यावरच तालुक्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाचे वर्चस्व असणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.