कल्याण डोंबिवली महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प गेल्या आठ वर्षापासून अडगळीत पडला असताना नवनिर्वाचित आयुक्त इंदू राणी जाखड यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. अटाळीतील बाधित होणार्या सुमारे 11 एकर जागे संदर्भात जमिनी मालकांनी भूसंपादन मोजणीला हिरवा कंदील दाखविल्याने भूसंपादन शक्य होणार असल्याचे म्हटले गेले आहे.
रिंग रूटला अटाळी येथील बाधित होणार्या शेतकर्यांनी तीव्र विरोध करीत मोजणीला विरोध दर्शवला होता. मोकळ्या जमिनीवर असणार्या शेतीवर शेतकर्यांचा उदार निर्वाह तसेच ताडीची सुमारे 300 झाडे आणि बांधण्यात आलेल्या चाळी रिंग रूट मध्ये अशी सुमारे 11 एकर जागा बाधित होत आहे. यामुळे आता येथील बाधित होणार्या शेतकर्यांनी भरपाई संदर्भात पालिकेकडे सतत मागणी केली होती. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी लक्ष घालीत पालिका आयुक्तांबरोबर याबाबत पूर्वी चर्चा करीत बाधित शेतकर्यांना न्याय मिळवून दिला आहे.
अटाळीतील हद्दीतून जाणार्या रिंग रूट मुळे बाधित जमिनीचा टिडीआरडीआर देण्याचे मान्य करीत तसेच ताडाच्या एका झाडाची किंमत तीस हजार रुपये, बाधित चाळ धारकांना तितक्याच चौरस फुटाचे घर, तसेच या मूळ जमिनी मालकास12.50. टीडीआर देण्याचे मान्य केले आहे. पालिकेचा रखडलेला रिंग रोड प्रकल्पाला यामुळे गती येणार असून मंगळवारी नगर रचना विभागाचे अधिकारी प्रत्यक्षात मोजणीसाठी आले असता येथील शेतकर्यांनी भूसंपादन मोजणीस विरोध केला नसल्याची माहिती बाधित शेतकरी तसेच रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव यांनी दिली आहे.
डम्पिंगला मात्र विरोधच
अटाळीतील मोकळ्या जागेवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कचरा डम्पिंग करता जागा आरक्षित करून टाकले असून या डम्पिंगला अटाळी मधील शेतकर्यांचा कायम विरोध असून गावात डंपिंग उभारणीला प्रखर विरोध दर्शविला आहे.