महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. भाजप आम्हीच सत्ता स्थापन करणार असा दावा करत असताना आता महा विकास आघाडीने देखील १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे. भाजप बहुमत चाचणीमध्ये अपयशी ठरल्यानंतर आम्हाला सत्तास्थापनेचा दावा करण्याची संधी मिळावी, अशी मागणी या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवे गटनेते जयंत पाटील यांनी केली आहे. यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. राज्यपाल उपस्थित नसल्याने हे पत्र त्यांच्या कार्यालयाने स्वीकारले.
आज सकाळी राजभवन येते @ShivSena @NCPspeaks व @INCMaharashtra या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल @BSKoshyari यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी या तिन्ही पक्षांना निमंत्रित करावे या विनंतीसाठी त्यांना विनंतीपत्र देण्यात आले. pic.twitter.com/cvatmslojt
— NCP (@NCPspeaks) November 25, 2019
राज्यपाल कार्यालयात पत्र दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “आम्ही राज्यपालांना १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र सोपवले आहे. भाजपने सुरुवातील संख्याबळ नसल्यामुळे सत्ता स्थापन करु शकत नाही, असे राज्यपालांना कळवले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी शपथविधी घेतला. यावेळी देखील त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे बहुमत चाचणीत भाजप अपयशी ठरल्यानंतर महा विकास आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.