सौदी अरब येथील मक्का तीर्थयात्रेला गेलेले २७ भाविक सोलापूरकर टुर्स कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या निवाऱ्याचे आणि खाण्यापिण्याचे खूपच हाल झाले होते. याशिवाय त्यांच्याकडे परतीचे विमान तिकीटही नव्हते. मात्र, अखेर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सौदी अरेबियातील भारतीय राजदूत अहमद जावेद यांच्या प्रयत्नांमुळे त्यांची मायदेशी परतण्याची सोय झाली आहे. हजयात्रा ही विशिष्ट काळातच केली जाते तर उमरा ही तीर्थयात्रा वर्षभरात कधीही केली जाते. सोलापुरातून काही पर्यटक दरवर्षीप्रमाणे यंदाही या उमरा तीर्थयात्रेकरता सौदीमधील मक्का-मदिना येथे गेले होते. ही एकूण पंधरा दिवसांची तीर्थयात्रा होती. यामध्ये ७ दिवस मक्का आणि ७ दिवस मदिना येथे मुक्काम केला जातो. त्यानुसार मक्का येथील सात दिवस संपवून भाविकांनी लॉजच्या रूममधून चेकआऊट केलं.
वाचा: बिग बी झळकणार ‘या’ मराठी चित्रपटात!
‘असिल’ या सोलापूरच्या टुर्स अँड ट्रॅव्हल कंपनीचा जो सेवक या भाविकांसोबक गेला होता, तो लॉजमधून निघून एकाएकी निघून गेला. त्याने या भाविकांची मदिना येथे पुढील ७ दिवसांसाठी राहण्याची तसंच त्यांच्या खाण्या-पिण्याची कोणतीच सोय केली नव्हती. त्यांचे परतीचे तिकीटसुध्दा त्यांनी केले नव्हते. यामुळे सोलापूरहून दुबईला आलेले हे यात्रेकरू घाबरले. त्यातील काहीजण अक्कलकोट नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अश्पाक बळोरगी यांचे नातेवाईक होते. त्यांनी तातडीने संबंधित राजकीय लोकांना फोन करुन सर्व हकीकत सांगितली. ही वार्ता मिळताच त्यांनीही तातडीने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना याबाबत कळवले. सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व सूत्र हलवत तातडीने सौदी अरब येथे असलेले भारतीय राजदूत अहमद जावेद यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या आणि अहमद जावेद यांच्या पुढाकारामुळे सोलापूरच्या त्या यात्रेकरूंना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध झाले.