पुराचे संकट कसेबसे टळल्यानंतर आता संसर्गजन्य आणि जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी, विशेषतः नदीकाठच्या रहिवाशांनी पाणी उकळूनच प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी ड्रेनेजमधील पाणी, घाण, कचरा शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मिसळला. यात मृत जनावरे, कुजलेल्या वस्तूंचाही समावेश होता. हेच पाणी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये जाऊन मिसळलेले आहे. खासकरून नदीकाठच्या जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठ्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने जलजन्य आजारांची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना पाणी उकळून आणि गार झाल्यानंतर पिण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात या आजारांची शक्यता
- लेप्टोस्पायरोसीस (लवकर निदान होत नाही. खूप थंडी आणि ताप भरून येतो. डोके दुखणे व अपचनाचा त्रास होतो)
- टॉयफॉइड (विषमज्वर)
- डायरिया (अतिसार)
- त्वचारोग
- अन्नातून विषबाधा
- माशांमुळे कॉलरा
- संसर्गजन्य रोगांमध्ये श्वसनाशी संबंधित विकार
या उपायांनी आजार राहतील दूर
पावसाळ्याच्या दिवसांत पाणी पाच ते २० मिनिटांपर्यंत उकळून, गार झाल्यानंतर त्याचा पिण्यासाठी वापर करावा. संसर्गजन्य आजार दूर राखण्यासाठी खिशात कापराची वडी ठेवावी. घरात गुग्गुल आणि राळयुक्त धूप जाळल्यास वातावरण शुद्ध राहून विषाणूजन्य आजारांचा धोका टळेल. ताप किंवा श्वसनविकारात कपाळावर सुंठीचा लेप लावणे लाभदायी ठरते. कॉईलऐवजी तमालपत्र जाळल्यास डास दूर राहून डेंग्यू, मलेरियाची शक्यता कमी होते. – डॉ. राहूल पगार