‘हिंदू संघटन हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चेहरा आहे. मात्र आता पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजाच्या शिवाय हिंदुत्व अधुरं आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांनी ‘खरंच जर यांना असे वाटत असेल, तर राम मंदिर बांधत असताना तुमच्याच अनुयायांनी पाडलेली मस्जिद बांधणार आहात का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ‘आपण सगळे भारतमातेचीच मुले आहोत. सगळ्यांमधला बंधुभाव जपला पाहिजे. सगळे आपलेच आहेत. जे दुरावले आहेत त्यांना जोडायचे आहे’, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर आता काँग्रेसकडून जोरदार टीका होत आहे.
काय म्हणाले महाजन?
सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हौस आणि आपले मनोरथ उघड न करता लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याची सवय यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेले तीन दिवस दिल्लीत केलेली भाषणे म्हणजे परस्पर विसंगत विधाने, संघाच्याच इतिहासाशी बेईमानी आणि लोकांच्या मनात सतत संभ्रम निर्माण करण्याच्या सवयीचे उत्तम उदाहरण आहे.
वित्त आयोगाची फजिती कुणामुळे?
केंद्रीय वित्त आयोगाचं सदस्य मंडळ राज्यातील सरकारी व बिगर सरकारी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी नुकतंच राज्यात आलं होतं. या बैठकीपूर्वी केंद्रीय वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचे विदारक चित्र जाहीर पत्रक काढून उभे केले होते. मात्र केवळ चार दिवसांतच या वित्त आयोगाने कोलांटउडी मारून राज्याच्या आर्थिक स्थितीचे कौतुक करून टाकले. ‘यापैकी वित्त आयोगाचे खरे मत कोणते समजायचे? आपण दिलेल्या आकडेवारीची जबाबदारी वित्त आयोगाने राज्याच्या महालेखापालांवर टाकली असून, त्यांनी दिलेल्या आकडेवारीच्या आधारे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे पत्र प्रसिद्ध केल्याचे अजब स्पष्टीकरण देऊन वित्त आयोगाने विश्वामित्री पवित्रा घेतला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य पातळीवरील भाजपच्या ‘सुशासनाचा’ दावा फोल ठरवणारा हा गोंधळ कुणाच्या दबावामुळे झाला? हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे,’ अशा शब्दांत रत्नाकर महाजन यांनी वित्त आयोगाच्या गोंधळावर भाजपला सुनावले आहे.