कोरोना लॉकडाऊनपासून बंद असलेली रोहे-दिवा मेमु सेवा आता पुन्हा शुक्रवारपासून सुरू होत असल्याने विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह इतर प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.अलिकडे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर आणली जात असताना कायम गर्दी असलेल्या रोहे-दिवा पॅसेंजरला मात्र सुरू होण्यासाठी संमती दिली जात नसल्याने प्रवाशांत प्रचंड नाराजी होती. गणेशोत्सवात सुरू करण्यात आलेल्या सावंतवाडी, रत्नागिरी पॅसेंजरनाही ठराविक थांबे दिले गेल्याने प्रवाशांना एसटी किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. परिणामी रोहे-दिवा पॅसेंजर सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती.
ही सेवा पूर्ववत होण्यासाठी रोहे रेल्वे प्रवासी समिती अविरत संघर्ष करीत होती. अलिशान वाहनांतून फिरणार्या आणि सामान्य प्रवाशांना होणार्या त्रासाचे सोयरसुतक नसलेल्या स्थानिक पुढार्यांनी तर याकडे सुरुवातीला सपशेल दुर्लक्ष केल्याने समितीचा संघर्ष एकाकी चालू होता. अखेर या समितीने खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. महेंद्र दळवी, आ. अनिकेत तटकरे यांचे लक्ष निवेदनाद्वारे वेधले. त्याची दखल घेत खा. तटकरे यांनी तात्काळ मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेत तातडीने दिवा-रोहे मेमु रेल्वे सेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी केली. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने २९ ऑक्टोबरपासून या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी जर जागृत असते तर ही सेवा आधीच सुरू झाली असती, अशी प्रतिक्रिया आता ऐकावयास मिळत आहे.
दरम्यान, सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी रोहे येथून सकाळी ५.१५ आणि दुपारी ४.१५ वाजता सुटेल. तर दिवा येथून सकाळी ८.४५ आणि रात्री ८ वाजता सुटेल. लोकलच्या नियमांप्रमाणे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना यामधून प्रवास करण्यासाठी तिकीट उपलब्ध होणार आहे.
हे ही वाचा – NEET Result 2021 : नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी