राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत आपला गड राखला आहे. काँग्रेसकडून देगलूर पोटनिवडणुकीसाठी जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीचे निकाल २ नोव्हेंबर रोजी हाती आले यामध्ये जितेश अंतापूरकर यांनी भरगोस मतांनी विजय मिळवला आहे. देगलूरमध्ये विजय मिळवल्यावर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी अध्यक्ष शऱद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
देगलूरमधील विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच चुरशीची ठरली. भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अंतापूरकर यांनी आघाडी घेतली आणि पुढेही तीच आघाडी कायम ठेवत साबणे यांचा पराभव केला आहे. दुपारनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन अशोक चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काँग्रेसचे हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीसुद्धा अशोक चव्हाण यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच या प्रमुख नेत्यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या असल्याचे चव्हाण यांनी ट्विट करत सांगितले आहे.
अंतापूरकर भरगोस मतांनी विजयी
जितेश अंतापूरकर यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा ४१ हजार ९१७ मतांनी पराभव केला. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ७८९ तर भाजपचे सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.उत्तम इंगोले हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना ११ हजार ३४७ मते मिळाले आहेत.
हेही वाचा : दिवाळीमध्ये शिवसेनेचे सीमोल्लंघन, प्रवीण दरेकरांनी शुभेच्छा देत लगावला टोला