इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला. मुंबईचा संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मात्र, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईला अद्याप विजयाचा नारळ फोडता आलेला नाही. त्यामुळं आता रोहितनं मुंबईचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे सोपवावं असा सल्ला भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दिला आहे. आयपीएलमधील आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात होणार असून, या सामन्यात रोहित शर्मा आपलं कर्णधारपद किरॉन पोलार्डकडे सोपवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
‘इएसपीएनक्रिकइन्फो’ला दिलेल्या मुलाखतीत संजय मांजरेकर यांनी ‘मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मानं किरॉन पोलार्डकडे सोपवावं’ असं वक्तव्य केलं होतं. ‘पोलार्डला चार सामन्यांत ४७ धावा करता आल्या आहेत. तरीही तो मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो आणि त्याचा कर्णधार म्हणून विचार करायला हवा’, असं मत मांजरेकर यांनी व्यक्त केले.
‘रोहितच्या नावावर 5 जेतेपदं आहेत आणि मुंबई इंडियन्स सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. मुंबई इंडियन्सकडे सक्षम खेळाडू नसल्यामुळं त्यांना हार मानावी लागली आहे. पोलार्ड अजूनही संघासाठी अमुल्य योगदान देऊ शकतो. रोहित शर्माने विराटच्या पावलावर पाऊल ठेऊन कर्णधारपद सोडावं असं वाटतं. त्यामुळं तो रिलॅक्स होऊन फक्त फलंदाज म्हणून दमदार कामगिरी करू शकतो. त्यानं ही जबाबदारी पोलार्डकडे सोपवायला हवी. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे’ असंही यावेळी संजय मांजरेकर यांनी म्हटलं
सर्वाधिक 5 जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला 15 व्या पर्वात सलग 4 पराभव पत्करावे लागले आहेत. मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. आज मुंबईचा मुकाबला पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे. मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – IPL 2022: रोहित शर्मा, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात षट्कारांची स्पर्धा, कोण आहे आघाडीवर?