पानिपतच्या युद्धात मराठे हरल्यामुळे देश 200 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत गेला. 2019 चे युद्धही असेच महत्त्वाचे आहे. असा मराठ्यांच्या इतिहासाचा दाखला देत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप आणि शिवसेना युतीचे स्पष्ट संकेत दिले.
लोकसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या असताना भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारपासून राजधानीत सुरू झाले. देशभरातून अधिवेशनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना शहा यांनी मराठ्यांचा इतिहास सांगितला. 130 युद्ध जिंकणारी मराठा सेना पानिपतचं एक निर्णायक युद्ध हरली आणि त्यानंतर भारत 200 वर्षांच्या गुलामीत गेला. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात केली. संभाजी महाराज, ताराबाई, पेशव्यांपर्यंत राज्यविस्तार झाला. पण एक लढाई हरली आणि गुलामगिरी आली. पेशव्यांनी 131 युद्ध जिंकली, याचे स्मरण शहा यांनी केले.
उद्घाटनाच्या भाषणात अमित शहांनी मराठ्यांच्या इतिहासाचे स्मरण करणे याला खास महत्त्व आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वात जास्त 48 जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याची भाजपची योजना आहे. त्यामुळे थोडे नमते घ्यावे लागले तरी चालेल, मात्र शिवसेनेसोबत युती करायचीच असा भाजपचा इरादा पक्का आहे. हे आता उघडपणे दिसून येत आहे.
अमित शहांनी मराठ्यांच्या इतिहासाचे स्मरण केले. शिवाजी महाराजांचा गौरव केला आणि सदाशिवराव पेशव्यांचेही स्मरण केले. पानिपतात हरल्याची जखम अजूनही मराठी माणसांच्या मनात भळभळत असते. त्याचा आधार घेत शहांनी 2019 च्या निवडणुकीची तुलना पानिपतच्या युद्धाशी करून निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला इतिहासाची आठवण करून दिली. या माध्यमातून 2014 प्रमाणे पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने कौल देण्याचे भावनिक आवाहन केले.
महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चाही सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीसाठी नमते घेऊन भाजपने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मागण्या मान्य करण्याचे ठरवले असल्याचे समजते. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या बैठकीत युतीचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. त्यानंतर फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुप्त बैठक होऊन युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता फक्त घोषणा व्हायचे बाकी आहे.