ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकारचा विषाणू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण जग अलर्ट झाले आहे. भारत सरकारने तर आजपासून ब्रिटनमध्ये जाणारी आणि तेथून भारतात येणारी विमाने रद्द केली आहेत. मुंबईत मंगळवारी रात्रीपर्यंत विमानाने आलेल्या १ हजार ६८८ प्रवाशांपैकी एकही प्रवासी पॉझिटिव्ह आढळलेला नाही. सर्व प्रवासी निगेटिव्ह आढळले असल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कोरोनाबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमानुसार, खबरदारी म्हणून या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
महापालिका यंत्रणा सतर्क
ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना आढळल्यानंतर केंद्र सरकारने ब्रिटनची विमानसेवा खंडित केली असून इतर देशातून येणाऱ्या विमानांतील प्रवाशांवर कडक नजर ठेवण्यात येत आहेत. राज्य सरकार आणि महापालिका यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे.
७४८ प्रवाशांना क्वारंटाईन
वास्तविक, ब्रिटनवरून अगोदरच नियोजित असलेली विमाने तेथून निघाली आणि मंगळवारपर्यंत दाखल झाली. मुंबईत एकूण पाच विमाने येणार होती. त्यापैकी एक विमान रद्द झाले. उर्वरित चार विमाने मुंबईत रात्री उशिरापर्यंत दाखल झाली असून त्यामधून एकूण १ हजार ६८८ प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले होते. त्यांची पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कसून तपासणी केली. त्यापैकी ७४८ प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले आहे. उर्वरित प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवून तेथे क्वारंटाईन केले आहे. तर दोन प्रवाशांची घरची अडचण असल्याने त्यांना त्यांच्या घरी जाणे आवश्यक होते. त्यामुळे खबरदारी घेऊन त्यांना घरी सोडण्यात आले असून ते होम क्वारंटाईन होणार आहेत.
हेही वाचा – राज्यात ३,९१३ नवे रुग्ण, ९३ जणांचा मृत्यू