देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे, तर कोरोनाची लागण होऊ नये म्हणून घऱगुती उपचार देखील कोरोना दरम्यान करण्यास सांगण्यात आले होते. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा पिण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानेच दिला होता. काढा प्यायल्यामुळे यकृताला त्रास होतो असा दावा वारंवार करण्यात येत होता. पण खुद्द आयुष मंत्रालयाने हा दावा फोल ठरवला आहे.
आयुष मंत्रालयाने सांगितलं की, ही अतिशय चुकीची धारणा आहे. काढा बनवण्यासाठी वापरले जाणारे सगळचे पदार्थ आपण नेहमीच स्वयंपाकामधील असून हे पदार्थ भारतामध्ये अनेक वर्षांपासून वापरले जात आहेत. त्यामुळे काढा प्यायल्यामुळे यकृताला अर्थात लिव्हरला कोणताही अपाय होत नाही.
काढा बनवण्यासाठी दालचिनी, तुळस, काळीमिरीचा वापर केला जातो. या पदार्थाच्या एकत्रित सेवनामुळे आपले श्वसनतंत्र सुधारते. या पदार्थांसोबत सुंठ, मनुकांचादेखील काढ्यामध्ये वापर करावा.या काढ्याचे सेवन दिवसातून एकदातरी करणं आवश्यक आहे, असे देखील आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या काढ्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच हा काढा पिण्याचा सल्ला दिला होता. तसेच काढ्यामुळे लिव्हरवर काही वाईट परिणाम होतो अशा चर्चांना स्वतः आयुष मंत्रालयाने सत्य सांगितले आहे.