संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारी २०२२ पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले तर दुसऱ्या दिवशी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांनी रेल्वे, कृषी, कॉर्पोरेट, शिक्षण आणि आरोग्य विभागासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच देशाच्या विकासाचा दर ९.८ टक्के राहणार असल्याचा दावा केंद्राकडून करण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी भाजपकडून संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणला जाईल. यानंतर विरोधकांकडून चर्चा सुरु करण्यात येणार आहे. काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी विरोधकांकडून चर्चा करण्यास सुरुवात करतील तसेच भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेत भाजपकडून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणला जाईल. या प्रस्तावावर चर्चा करण्यात येईल. चर्चेदरम्यान उत्तर देण्यासाठी काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी बोलतील. लोकसभा आणि राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार असून विरोधकांना उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करणारे विरोधकांकडून पहिले वक्ते असतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ५० मिनिटांच्या संसदेतील अभिभाषणामध्ये म्हटलं आहे की, आमचे सरकार धोरणांमध्ये गरीब आणि समाजातील उपेक्षित घटकांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी सज्ज आहेत. अधिवेशनात कथित पेगासस हेरगिरीसह अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. एका खासगी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये भारत सरकारने पेगासस सॉप्टवेअर खरेदी केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं होते. यावेळी पुन्हा विरोधक संसदेत सत्ताधाऱ्यांना पेगासस हरेगिरी प्रकरणावरुन जाब विचारतील. काँग्रेस लोकसभा नेते अधीर रंजन चौधरी यांनी यापूर्वीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे विशेषाधिकार प्रस्तावाची मागणी केली आहे. पेगासस मुद्द्यावर सभागृहाची दिशाभूल केली असल्याचा आरोप अधिर रंजन चौधरी यांनी केला आहे.
हेही वाचा : करोडो रुपयांची कांदळवन जमीन जेएसडब्ल्यूला आंदण महसूल खात्याच्या निर्णयामुळे खळबळ