भारत-चीन वादावरुन देशआतील राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस सतत प्रश्न विचारुन सरकारला हैराण करुन सोडत आहेत. त्यात आता जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रश्न विचारताच तुम्ही देशद्रोही, चिनी एजंट, गद्दार, हिंदू आणि लष्करविरोधी घोषित होऊ शकता अशा शब्दांत कन्हैय्या कुमार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कन्हैय्या कुमार यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नोटाबंदी, जीएसटी, पुलवामा हल्ला आणि लडाखमधील चकमकीसंबंधी प्रश्न उपस्थित केलात तर तुम्ही देशद्रोही घोषित होऊ शकता असं म्हटंल आहे.
कन्हैय्या कुमार यांनी ट्विटमध्ये “नोटाबंदी केल्याने काळा पैसा आला का? जीएसटीमुळे कर चोरी थांबली का? पुलवामा हल्ल्यातील दोषी पकडले गेले का? गलवान खोऱ्यात सगळं काही ठीक आहे का? असे प्रश्न विचारले आहेत. यानंतर त्यांनी उपहासात्मकपणे टीका करत सावधान राहा, प्रश्न विचारताच तुम्ही देशद्रोही, चिनी एजंट, गद्दार, हिंदू आणि लष्करविरोधी घोषित होऊ शकता,” असं म्हटलं आहे.
क्या नोटबन्दी से कालाधन आया?
क्या जीएसटी से कर की चोरी रुक गई?
क्या पुलवामा हमले के दोषी पकड़े गए?
क्या गलवान घाटी में सब ठीक है?सावधान! ये सवाल पूछते ही आप देशद्रोही, गद्दार, चीनी एजेंट, हिन्दू और सेना विरोधी घोषित किए जा सकते हैं।
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) June 21, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असं विधान सर्वपक्षीय बैठकीत केलं होतं. यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनीदेखील प्रश्न विचारणाऱ्यावंर टीका केल्याबद्दल मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. तर राहुल गांधी देखील सतत प्रश्न विचारत सरकारवर निशाणा साधत आहेत.
हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात ३८७० नव्या रुग्णांची नोंद; १०१ जणांचा मृत्यू
नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विरोध करणारे वक्तव्याचा विपर्यास करत आहेत अशी टीका केंद्र सरकारने केली. यावर कमल हासन यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही. तसंच लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. “प्रश्न विचारणं देशविरोधी होत नाही. आपल्या घटनेने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे आणि जोपर्यंत सत्य ऐकायला मिळत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार,” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे.