सुप्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून जगभरात ओळखले जाणारे अल्बर्ट आईन्स्टाईन जातीवादी असल्याचे समोर आले आहे. आईन्स्टाईन हे इतर देशातील लोकांना तुच्छ लेखत असत, अशी माहिती त्यांनी लिहिलेल्या डायरीतून समोर आली आहे. १९२२-२३ मध्ये त्यांनी जर्मन भाषेत लिहिलेल्या डायरीचे भाषांतर इंग्रजीत करण्यात आले आहे. शास्त्रज्ञ होण्यापूर्वी त्यांनी ही डायरी लिहिली असल्याचे सांगितले जात आहे. आशिया आणि मध्यपूर्व खंडात प्रवासादरम्यानचे अनुभव त्यांनी या डायरीत लिहून ठेवले होते.
लंडनच्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेसचे ‘रोसेनक्रझ’ यांनी आईन्स्टाईन यांच्या डायरीतील पानांवरील मजकुराचे संपादन आणि भाषांतर केले. याबाबत अधिक माहिती देताना युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आईन्स्टाईन यांची डायरी जगासमोर पहिल्यांदाच प्रसिद्ध करण्यात येत आहे. लवकरच ही माहिती सर्वांना मिळणार आहे. डायरीतील काही भागात बर्लिन येथे रहाणाऱ्या आपल्या सावत्र मुलीबद्दलची माहितीही त्यांनी लिहिली आहे.”
डायरीत भारतीयांचाही उल्लेख
आईन्स्टाईन यांनी ऑक्टोबर १९२२ ते मार्च १९२३ दरम्यान डायरी लिहिली होती. आईन्स्टाईन यांनी रविंद्रनाथ टागोरांना ‘गुरू’ म्हणून संबोधले असले तरीही ते भारतीयांचा द्वेश करत असत. भारतींच्या रहाणीमानाचा दर्जा हा खालचा असल्याची टीका त्यांनी केली होती. डायरीमध्ये भारतीयांना ‘कनिष्ठ दर्जेचे जीवन जगणारे’ म्हणून संबोधले आहे. कोलंबिया प्रवासादरम्यान भारतीयांबाबत आलेला अनुभव त्यांनी डायरीत लिहून ठेवला आहे.
चीन आणि श्रीलंकेबाबत द्वेष
भारतीयांबरोबरच चीन आणि श्रीलंका येथील नागरिकांबाबतही त्यांनी डायरीत लिहिले आहे. चीनचे नागरिक टेबलावर बसून जेवत नाहीत तर मांडी घालून जेवतात. डायरीत चीनमधील मुलांना ‘आत्माहीन आणि मंद’ म्हणून संबोधले असून घोड्यांसारखे श्रम करुन देखील त्यांचा ठसा कुठेही उमटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीलंकेतील नागरिक (तेव्हाचे सिलोन) हे घाणीत रहात असून अगदी खालच्या पातळीला जाऊन कष्ट करतात, असेही त्यांनी नमूद केले आहे.