मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या चार्टड विमान अपघातात आता मन हेलावून सोडणारी बातमी समोर येत आहे. गुरूवारी २८ जून २०१८ रोजी झालेल्या अपघातात ४ कंपनी कर्मचाऱ्यांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या विमान अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्घटनेनंतर टेक्निशियन सुरभी गुप्ता या दोन महिन्यांच्या गरोदर होत्या, अशी माहिती आता शवविच्छेदन अहवालातून समोर येत आहे. १८ जुन २०१८ रोजी सुरभी गुप्ता यांचा विवाह सोनिपतमधील पायलट ब्रजेश यांच्याशी झाला. लग्नानंतर सुरभी अंधेरीतील महाकाली परिसरामध्ये वास्तव्याला होत्या. गुरूवारी सी-९० या चार्टड विमानाची चाचणी घेत असताना उड्डाणावेळी त्या देखील विमानात टेक्नीशीयन म्हणून हजर होत्या. पण, काळाने घाला घातला आणि सुरभी यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
…अन् सुखी संसारावर काळाचा घाला
ब्रजेश आणि सुरभी गुप्ता यांचा विवाह १८ जुन २०१७ रोजी विवाह झाला. केवळ वर्षभरातच ब्रजेश आणि सुरभी यांना घरात येणाऱ्या नवीन सदस्याची चाहुल लागली आणि उत्तुंग भरारी घेणाऱ्या या दोघांनाही आकाश ठेंगणे वाटू लागले. आकाश कवेत घेणाऱ्या हा दोघांनीही किती स्पप्ने रंगवली असतील! उंच उंच भरारी घेणाऱ्या ब्रजेश आणि सुरभी यांनी संसारात येणाऱ्या नव्या सदस्याने देखील आयुष्यात वाऱ्याचे वेगाने पुढे जाण्याची स्वप्ने पाहली असतील, नाही का? आपण आई-बाबा होणार या गोड बातमीने दोघेही आनंदाच्या रंगात न्हाऊन निघाले असतील!नाही का? धुडधुडी पावले अख्खे घर व्यापून टाकणार या कल्पनेने दोघांच्याही मनाने नव्या सदस्याच्या आगमनाची तयारी केली असेल, नाही का? आपण दोघेही पायलट मग आपल्या बाळाने देखील पायलटच व्हावे अशी लुटुपुटुची भांडणे देखील झाली असतील दोघांमध्ये, नाही का? पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. काळाला त्यांचे हे सुख पाहावले नाही असे म्हणायचे का? अगं नियती तु इतकी कठोर का झालीस? ब्रजेश आणि सुरभी सुखी यांच्या संसारावर काळाने घाला घातला आणि पेशाने टेक्नीशीयन असणाऱ्या सुरभी गुप्ता यांचा चार्टड विमान अपघातात मृत्यू झाला. क्षणात होत्याचे नव्हते झाले! बाळासाठी पाहिलेली स्वप्ने त्या विमान अपघातामध्येच गडप झाली. कारण दोन महिन्यांच्या गरोदर असलेल्या सुरभी गुप्ता यांचा विमान अपघातात जागीच मृत्यू झाला आणि नियती किती क्रुर असते याचा प्रत्येय आला. नियतीच्या या क्रुरपणामुळेच ब्रजेश आणि सुरभी गुप्ता यांनी पाहिलेली सर्व स्वप्ने आता काळाच्या पोटात चिर निद्रा घेत आहेत.
तांत्रिक दृष्ट्या अकार्यक्षम विमान
मुंबईतील युव्हाय एव्हिएशनने उत्तरप्रदेश सरकारकडून २०१४ साली घेतलेले चार्टड विमान हे तांत्रिक दृष्ट्या अकार्यक्षम होते. तशी माहिती घाटकोपर विमान अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या तंत्रज्ञ सुरभी गुप्ता यांनी आपल्या वडीलांना फोनवरून दिली होती. विमानाची चाचणी घेण्यापूर्वी आम्ही तांत्रिक दृष्ट्या अकार्यक्षम विमानाची चाचणी घेत आहोत अशा आशयाचा फोन सुरभी यांनी आपल्या वडीलांना केला होता. विमान जर तांत्रिक दृष्ट्या अकार्यक्षम असल्यानंतर देखील युव्हाय एव्हिएशनने विमान उड्डाणाचा निर्णय का घेतला? कंपनीने विमानामध्ये असलेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष केले का? असे सवाल विचारले जात आहेत.
A day before she boarded the aircraft she told me that she’s about to fly a sick aircraft. This is a clear case of carelessness. This incident could have been avoided: Father of Maintenance Engineer Surabhi Gupta who lost her life in Ghatkopar plane crash (29.06.18) pic.twitter.com/Nigys7XUD8
— ANI (@ANI) June 30, 2018
विमान अपघातात ५ जणांचा बळी
गुरूवारी घाटकोपरमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये पायलट मारिया झुबेरी,को – पायलट प्रदीप राजपुत, तंत्रज्ञ सुरभी गुप्ता, मनीष पांडेसह पादचारी गोविंद पंडित यांचा मृत्यू झाला. पायलटने दाखवलेल्या प्रसंगवधामुळे विमान मानवी वस्तीमध्ये अथवा इमारतीवर धडकण्यापासून वाचले.