विशेष एनआयए कोर्टाने भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मोठा दणका दिला आहे. मालेगाव स्फोटप्रकरणी भाजपच्या लोकसभा उमेदवार आणि मुख्य संशयित साध्वी प्रज्ञा ठाकूरसह, कर्नल श्रीकांत पुरोहितसह सर्व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे.
साध्वींनी भोगला नऊ वर्षांचा तुरुंगवास
मालेगाव येथे २००८ साली मोठा बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला अटक केली होती. या प्रकरणावर अध्यापही कोर्टात खटला सुरु आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून नऊ वर्षांचा तुरुंगवास भोगला. सध्या त्या जामीनावर सुटल्या आहेत. दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपने भोपाळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा – मालेगाव स्फोटातील संशयित प्रज्ञाला गांधीजी वाटतात सन्माननीय
उमेदवारी जाहीर केल्यापासून वादग्रस्त वक्तव्यांना उधान
गेल्या काही दिवसांपासून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सतत चर्चेत राहत आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती. त्यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पाठराखण केली होती. मात्र, लोकांकडून झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माफी मागितली होती. यानंतर त्यांनी गुरुवारी पुन्हा वादग्र्त वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथ्थूराम गोडसे बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. नथ्थूराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि राहणार असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावरुन भाजपने कानउघाडणी केल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी शुक्रवारी मध्यरात्री ट्विटरवर माफी मागितली.
हेही वाचा – करकरेंना देशद्रोही म्हणणाऱ्या साध्वी नथुरामला म्हणाल्या देशभक्त!