युपीएच्या अस्तित्वाबाबतच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वादग्रस्त विधानानंतर कॉंग्रेसने एकाचवेळी ममतादीदींविरोधात हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेसच्या अनेक नेतेमंडळींनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या विजयाचे शिल्पकार राहिलेले राजनितीकार आणि राजकीय क्षेत्रातील चाणक्य समजले जाणारे प्रशांत किशोर यांनीही ममतादीदींच्या वक्तव्याला पाठिंबा देतानाच एक विधान केले आहे. लोकशाही पद्धतीने विरोधकांचे नेतृत्व निश्चित केले जावे अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली आहे. त्याचवेळी प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस नेतृत्वावरही टिप्पणी केली आहे. पक्षाच्या निवडणुकीतील विजयावरही त्यांनी विश्लेषण मांडले आहे. एकुणच कॉंग्रेसकडून विरोधकांचे नेतृत्व हा कोणाचा एकाचा दैवी अधिकार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
The IDEA and SPACE that #Congress represents is vital for a strong opposition. But Congress’ leadership is not the DIVINE RIGHT of an individual especially, when the party has lost more than 90% elections in last 10 years.
Let opposition leadership be decided Democratically.
— Prashant Kishor (@PrashantKishor) December 2, 2021
प्रशांत किशोर यांनी याआधीही मुंबईत येऊन सिल्वर ओकवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनवेळा भेट घेतली होती. पण ही भेट राजकीय भेट नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच राजकारणाच्या क्षेत्रातून मी बाहेर पडत असल्याचे आणि नवीन क्षेत्र निवडत असल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले होते. ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमधील विजयानंतरही प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसच्या पक्षातील नेतृत्वाच्या उणिवांचा उहापोह केला होता. त्यामध्ये कॉंग्रेस नेतृत्व हे पक्षीय रचनेत काळासोबत अमुलाग्र असे बदल करण्यास उत्सुक नसल्याचे मत त्यांनी मांडले होते. तसेच कॉंग्रेसमध्ये पक्षाअंतर्गत बदल स्विकारण्यासाठीची अनेकांची तयारी नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
ममता बॅनर्जी यांच्या युपीए अस्तित्वातच नाही, या टिप्पणीमुळे आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस पक्षाबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये कॉंग्रेस पक्ष हा सक्षम विरोधक म्हणून प्रतिनिधीत्व करत असल्याचे म्हटले आहे. पण कॉंग्रेसचे नेतृत्व हा कोणा एकाचा दैवी अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाने गेल्या दहा वर्षात ९० टक्के निवडणूकांमध्ये पराभव स्विकारला असल्याचेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
मुंबईत शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथे झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांशी भाजपविरोधात नेतृत्व उभारण्याबाबतची चर्चा बुधवारी केली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी युपीए अस्तित्वात नसल्याची टीका केली होती. त्यावर शरद पवारांनी सारवासारव करताना भाजपविरोधात लढताना कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल असे स्पष्टीकरण दिले होते.