एक कार कालव्यात पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लुधियानामध्ये घडली आहे. लुधियानामधील पायल नगरजवळील परिसरात ही दुर्घटना घडली असून येथील एका कालव्यात कार पडल्याने ५ जणांचा मृत्यू झाला. तसंच एक जण गंभीर जखमी असल्याचं समजतं. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार गाडीवरील ताबा सुटल्याने कार तलावात पडल्याचे समजते. याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. फॉर्च्युनर कारमधून 6 जण जात होते. लुधियानातल्या पायलजवळील झामट पुलाजवळ ते आले असता त्यांची कार कालव्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार कालव्यातून बाहेर काढली. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातात जतिंदर सिंग (४०) मुलगा भगवंत सिंग, जगतार सिंग (४५) मुलगा बावा सिंग, जग्गा सिंग (३५) मुलगा भजन सिंग, कुलदीप सिंग (४५) मुलगा करनेल सिंग आणि जगदीप सिंग (३५) मुलगा गुरमीत सिंग अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघातात कारमधील नांगला येथील मेवा सिंग यांचा मुलगा संदीप सिंग बचावला. कालव्यात पोहत तो बाहेर येण्यात यशस्वी झाला. संदीप याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.
हेही वाचा – एखादा माथेफिरू ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असल्यास त्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करा : संजय राऊत