बेरोजगारी ही देशाची एक गंभीर समस्या आहे. सध्या देशभरात ही समस्या जास्त भेडसवत आहे. या बेरोजगारीबाबत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने एक सर्वेक्षण केलेले आहे. या सर्वेक्षणात २०१७-१८ वर्षातील बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला असल्याचे समोर आले आहे. देशातील बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षातील उच्चांक पातळीवर पोचला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेल्या नियतकालिका श्रम शक्ती या सर्वेक्षणाने दिलेलल्या माहितीनुसार, देशात २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर हा ६.१ टक्के इतका आहे. या अहवालानुसार १९७२-७३ नंतर प्रथमच बेरोजगारीचा हा दर सर्वाधिक आहे.
मोदी सरकारने रोखला होता अहवाल
बुधवारी या अहवालासंबंधी महत्त्वाची चर्चा सुरु होती. मोदी सरकारने हा अहवाल प्रकाशित होण्यापासून रोखला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत होती. मोदी सरकारने हा अहवाल रोखल्यामुळे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष पी. सी. मोहनन आणि सदस्य जे. व्ही. मिनाक्षी यांनी राजीनामा दिला. या दोघांच्या राजीनामाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल आला आहे. नोटबंदीनंतर देशातील अर्थव्यवस्थेची झालेली दूरावस्था याविषयी माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. नोटबंदीमुळे देशातील बेरोजगारीवर कसा परिणाम झाला, याविषयी सखोल माहिती या अहवालात देण्यात आली आहे. परंतु, हा अहवाल अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र, या अहवालानुसार १९७२-७३ पासूनच्या बेरोजगारीचा दर सध्या सर्वाधिक आहे.