घरसंपादकीयदिन विशेषथोर कृषिशास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर

थोर कृषिशास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर

Subscribe

श्रीपाद अच्युत दाभोळकर उर्फ मुकुंद दाभोळकर यांचा आज स्मृतिदिन. श्रीपाद दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ, कृषिशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आपल्याला जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे असे ते म्हणत. माठात भोपळा वाढवणे, स्वतः पपई पिकवून आणि खाऊन त्याच्या सालांवर व बियांवर कोंबडीपालन करणे, नागफणीवर शेळी वाढवणे, स्वमूत्रावर केळी वाढवणे असे त्यांचे प्रयोग लहानपणापासूनच सुरू होते.

आपल्या पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांच्या उर्जेचा मूळ स्रोत सूर्य, हा आपल्या प्रकाशाचे सर्वांना समान वाटप करत असतो. त्याच्या या प्रकाशाला जास्तीतजास्त हिरव्या पानांनी शोषून घेतले, तर शेतकरी खूप समृद्ध होऊ शकेल, हेच दाभोळकर आयुष्यभर प्रयोगाने सिद्ध करत राहिले. कोल्हापूरला कुंडीत वाढविलेल्या द्राक्षाच्या एका वेलीवरच्या प्रत्येक पानाला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवून देऊन त्यांनी द्राक्षाच्या तब्बल शंभर घडांचे उत्पन्न मिळवले. ते बघून शेतकर्‍यांना सूर्यशेतीची महती उमगली आणि मग महाराष्ट्रात द्राक्षाची क्रांती झाली.

- Advertisement -

कुठल्याही शेतकी महाविद्यालयात न शिकवता केवळ अनौपचारिक शिक्षण देऊन दाभोळकरांनी महाराष्ट्राला शेतीत समृद्ध केले. एका रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात कुजलेल्या काँग्रेस गवतावर त्यांनी ऊस लागवड केली. भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश वापरून पाच महिने तो ऊस यशस्वीपणे वाढवला. रसायनांच्या मागे न लागता फक्त सूर्यप्रकाशाच्या शक्तीवर शेतात साखरेची निर्मिती कशी करता येईल, हे त्यांनी दाखवले.

सकाळी अंघोळ करताना आपल्या शरीराचा मळ निघून जातो. या मळात शेण कुजण्यासाठी आवश्यक असणारे कोट्यवधी जीवाणू असतात, असे दाभोळकर म्हणत. कृषिक्षेत्रातील खर्च कमी करून उत्पादकता वाढवायला दाभोळकरांनी दाखवलेला मार्ग नक्कीच उपुयक्त आहे. ‘केल्याने होत आहे रे’, ‘विपुलाच सृष्टी’, ‘आपला हात जगन्नाथ’ इत्यादी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून हे ज्ञान आजही उपलब्ध आहे. अशा या प्रयोगशील कृषिशास्त्रज्ञाचे ३० एप्रिल २००१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -