गेली ३८ वर्षे काव्याची गंगा अविरतपणे रसिकांसमोर घेऊन येणाऱ्या विसूभाऊ बापट यांच्या मुकुटात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलाय. अविरत प्रतिष्ठान आणि क्वॉलिटी ट्रॅव्हल वर्ल्ड प्रस्तुत ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या काव्यरसाने परिपूर्ण कार्यक्रमाचा ३०००वा प्रयोग रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. रविकिरण मंडळाच्या कवितांपासून ते नवकवितांचा प्रवाह कसा बदलत गेला हे सांगत, गीत संगीताच्या माध्यमातून कवितांचा हा प्रवास विसुभाऊंनी उलगडत नेला. नाट्यसंगीत, भावगीतं, भक्तीगीतं, देशभक्तीपर गीतं, अंगाई, बडबड गीतं, चारोळ्या, गझल, संतरचना, पंतकाव्य, सवाल-जवाब अशा असंख्य काव्यप्रकारांचा नजराणा सादर करून विसुभाऊंनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकारांच्या उपस्थितीत काव्याचा हा जागर पार पडला. ‘कविता’ हा एकमेव विषय घेऊन गेली कित्येक वर्ष विसुभाऊ ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधन करत महाराष्ट्रभर फिरत आहेत. ‘पण आता इथेच न थांबता विसूभाऊंनी ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या एकपात्री प्रयोगाचे जास्तीत जास्त प्रयोग करावेत, अनेक ज्ञात-अज्ञात कवितांचा खजिना रसिकांसाठी घेऊन यावा’ अशी इच्छा व्यक्त करत उपस्थितांनी विसुभाऊ आणि त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
‘कुटुंब रंगलाय काव्यात’ चे ३००० प्रयोग होणं हे माझं भाग्य असून रसिकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादांमुळे मी हा टप्पा पार करू शकलो. आजवर सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलय, यापुढेही हा स्नेह असाच वृद्धिंगत होत राहावा’ – विसुभाऊ