कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिकेने १५० भाग पूर्ण केले आहेत. मालिका सुरु होण्याआधीपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता होती. कारण, या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांना भेटायला आली. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता तब्बल १५० भागांचा पल्ला गाठला आहे.
मृणालने नुकताच तिच्या इंस्टावर १५० भाग पूर्ण केले याबद्दल शशांक आणि तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. शशांक आणि मृणालची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, शर्मिष्ठा राउत हे कलाकार मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तर मंदार देवस्थळी या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच घटना बघायला मिळणार आहेत.
सध्या मालिकेत काय बघायला मिळणार
नुकताच मालिकेमध्ये रंगपंचमी झाली. अविच्या मृत्यानंतर अनुने रंगपंचमी साजरी करणं सोडून दिलं आहे. मात्र यावेळी सिध्दार्थ अनुरा रंग लावतोच. अनु आणि सिद्धार्थमध्ये पुन्हा मैत्री झाली आहे आणि हेच कुठेतरी दुर्गाला खटकत आहे आता यांची मैत्री पुन्हा तोडण्यासाठी ती कुठलं नवं कारस्थान रचेल ? सिद्धार्थ आणि अनु यांची मैत्री ती तोडू शकेल का ? हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे.
“सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका करतानाचा प्रवास अप्रतिम आहे. आम्ही खूप मेहेनत घेतो आहे, खूप मज्जा येते आहे. आमची सेटवर खूप छान टीम तयार झाली आहे. १५० भाग पूर्ण झाले आहेत यावर विश्वास बसत नाहीये. खरं सांगायचं तर अनु ही भूमिका माझ्या खुपचं जवळची भूमिका आहे. मी आजवर साकारलेल्या सगळ्याच भूमिका मला प्रिय आहेत आणि महत्वाच्या वाटतात पण, अनु मला जवळची वाटते कारण, ती खूप खंबीर आहे, स्वावलंबी आहे आणि खूप माझ्यासारखी आहे”.- मृणाल दुसानीस, अभिनेत्री