घरफिचर्सआयुष उपचारपद्धतीला आरोग्य विम्याच्या मर्यादा

आयुष उपचारपद्धतीला आरोग्य विम्याच्या मर्यादा

Subscribe

भारतीयांचा अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे; पण तितकासा त्यांचा विश्वास आयुष उपचार पद्धतीवर नाही. आरोग्य विम्याचा दावा संमत होण्यासाठीही आयुष उपचार पद्धतीवर बर्‍याच मर्यादा आहेत. सध्याचे केेंद्र सरकार आयुष उपचार पद्धतीचा पुरस्कार करणारे आहे. सध्या केंद्रात आयुष मंत्रालय असे स्वतंत्र खातेही आहे. आयुष उपचार पद्धतीत आयुर्वेद, योगा, नेचरोपथी, युनानी, सिध्द व होमिओपॅथी या उपचारपद्धतींचा समावेश आहे. अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतींना पर्यायी म्हणून केंद्र सरकार या उपचार पद्धतींना पाठिंबा देत आहे.

१ एप्रिल २०२० पासून ‘आरोग्य संजीवनी’ या नावाची स्टॅडर्ड आरोग्य विमा पॉलिसी बाजारात आणण्यात आली आहे. ही पॉलिसी जितक्या रकमेची उतरविली असेल तितक्या रकमेपर्यंत आयुष उपचार पद्धतीचा दावा यात संमत होऊ शकतो. यापूर्वी आयुष उपचार पद्धतीचा दावा संमत करणार्‍या काही पॉलिसी होत्या; पण दाव संमत करण्यावर बर्‍याच मर्यादा होत्या. ‘इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) ही विमा उद्योगासाठी नियंत्रक यंत्रणा आहे. या नियंत्रक यंत्रणेने २०१३ मध्ये या पर्यायी उपचार पद्धतींना विमा संरक्षण देण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिल्या होत्या. पण या सूचनेवर किंवा सूचनेला विमा कंपन्यांनी विशेष महत्व दिले नाही. गेल्या तीन वर्षांत या पर्यायी उपचार पद्धती घेणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली असून, या उपचार पद्धतींच्या औषध विक्रीतही वाढ झाली आहे. या उपचार पद्धतीत नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात. तसेच काही प्रमाणात अ‍ॅलोपॅथीची औषधे ज्यापासून तयार केली जातात तेही पदार्थ काही प्रमाणात वापरले जातात.

तुम्ही आरोग्य संजीवनी किंवा आयुष उपचार पद्धती ‘कव्हर’ करणारी कुठलीही पॉलिसी घेतलेली असो पण त्यात हॉस्पिटलात दाखल झाल्यास, हॉस्पिटलच्या खर्चाचा दावा संमत करण्यात येणार असा ‘क्लॉज’ समाविष्ट हवाच. परिणामी कोणीही उपचारासाठी जर आयुर्वेदिक हॉस्पिटलात दाखल झाला तर त्याला हॉस्पिटलचा खर्च मिळू शकणार. आरोग्य संजीवनी विमा किमान ५० हजार रुपयांचा उतरावा लागतो. विमा किती रकमेचा उतरवावा यासाठी कमाला मर्यादा नाही. हॉस्पिटलात दाखल होण्यापूर्वीच्या अगोदरच्या ३० दिवसांच्या उपचारांचा खर्च व हॉस्पिटलातून घरी गेल्यानंतर पुढील ६० दिवसांच्या उपचाराचा खर्च या पॉलिसीत संमत होऊ शकतो.

- Advertisement -

आरोग्य संजीवनी वगळता अन्य विमा पॉलिसीत आयुष उपचारपद्धतीचा दावा जास्तीत ५० हजार रुपयांपर्यंतच संमत केला जातो. काही पॉलिसीत विमा रकमेच्या १० टक्के रक्कमच आयुष उपचार पद्धतीसाठी संमत होते. प्रत्येक पॉलिसीचे वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे आयुष उपचार पद्धतीसाठी ‘आरोग्य संजीवनी’ विमा पॉलिसीच घ्यावी.
आयुष उपचार पद्धतीचा खर्च आधुनिक अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतींच्या तुलनेत कमी असतो. दीर्घ चर्मरोग, मानसशास्त्रीय विकार, चेतासंस्थेचे आजार (न्युरॉलॉजिकल) यांची उपचारपद्धती आयुष पद्धतीने केल्यास खर्च कमी येतो. आयआरडीएआयच्या सूचनेनुसार दावा संमत होण्यासाठी आयुष उपचार पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये किमान ५ बेड हवेत. आणि हॉस्पिटलचा प्रमुख हा ‘क्वॉलिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर’ हवा. देशात जुलै २०२० पर्यंत ९८ आयुष हॉस्पिटल्स होती. आता या डॉक्टर्सना शस्त्रक्रिया करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे.

आयुष डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास फार विरोध होत आहे. होमिओपॅथी, युनानी किंवा आयुर्वेदिक या उपचार पद्धती ‘आऊट पेशन्ट’ म्हणून बरेच लोक घेतात. घरी औषधे घेतात; पण प्रामुख्याने विम्याचे संरक्षण हे ‘इन-पेशन्ट’साठी म्हणजे हॉस्पिटलात राहून उपचार घेणार्‍यांसाठी असते. विम्याचा दावा संमत होण्यासाठी किमान २४ तास हॉस्पिटलात असावे लागते. काही ‘डे-केअर’ उपचार पद्धतींसाठी हा २४ तासांचा नियम शिथिल करण्यात आला आहे. उदा. मोतिबिंदू शस्त्रक्रिया यासाठी २४ तास हॉस्पिटलात असणे गरजेचे नसते. आरोग्य संजीवनी विम्याचा दावा संमत करताना मंजूर झालेल्या रकमेपैकी ९५ टक्के रक्कम विमा कंपनीकडून मिळू शकते. ५ टक्के रक्कम रुग्णास भरावी लागते. विम्याच्या रकमेच्या २ टक्के इतकी रक्कम हॉस्पिटलच्या खोलीचे दररोजचे भाडे म्हणून संमत केली जाते. जर ५० हजार रुपयांची पॉलिसी असेल तर दिवसाला कमाल १ हजार रुपये हॉस्पिटलचे खोली भाडे संमत केले जाणार. यात बहुतेक कंपन्या कॅशलेस सुविधा देत नाहीत.

- Advertisement -

विम्याचा प्रीमियम मासिक भरा

आरोग्य विमा पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. शक्यतो नूतनीकरण तारखेच्या अगोदर नूतनीकरण करावे. पॉलिसीच्या एक वर्षाचा प्रीमियम, पॉलिसीचे नूतनीकरण करताना भरावा लागत होता. ही पद्धत चालू आहेच; पण आता दर महिन्याला ‘प्रीमियम’ भरण्याची म्हणजे एकूण १२ मासिक प्रीमियम भरण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना जेव्हा जोरात होता तेव्हा म्हणजे एप्रिल २०२० पासून मासिक प्रीमियम भरण्याचा नियम ‘आयआरडीएआय’ने अंमलात आणला. पॉलिसीधारक आता त्यांचा आरोग्य विम्याचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वर्षाचा एकदम त्यांना हवा तसा भरू शकतात. ही सुविधा सध्या फार कमी विमा कंपन्या देत आहेत.

विम्याचा प्रीमियम कोणत्याही पद्धतीने भरला तरी फायदे सर्वांना सारखेच मिळतात. मासिक हप्त्याने भरल्यास थोडी जास्त रक्कम भरावी लागते. कारण मासिक रक्कम भरणार्‍यांमुळे विमा कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज वाढते. एकही मासिक हप्ता चुकता कामा नये. प्रत्येक मासिक हप्ता वेळेतच भरला गेला पाहिजे नाहीतर पॉलिसी रद्द होते. वार्षिक प्रीमियम भरणार्‍यांसाठी नूतनीकरणाच्या दिवसापासून एक महिना ‘ग्रेस पिरियड’ मिळतो तर मासिक प्रीमियम भरणार्‍यांच्या बाबतीत फक्त ८ दिवसांचा ‘ग्रेस पिरियड’ असतो. ग्रेस पिरियडमध्ये प्रीमियम भरला तर नूतनीकरणाच्या दिवसापासून, ग्रेस पिरियडमध्ये भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपर्यंत कोणताही दावा संमत केला जात नाही. दावा संमत करताना सर्व प्रीमियम रक्कम वसूल केली जाते. उदाहरण द्यायचे तर पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम १२ हजार आहे. पॉलिसीधारकाने प्रीमियमचे दोन मासिक हप्ते म्हणजे २ हजार रुपये भरले आहेत. त्याचा ५० हजार रुपयांचा दावा संमत झाला आहे तर त्याला ४० हजार रुपयेच देण्यात येणार, उरलेले दहा महिन्यांचे हप्ते कापून घेतले जाणार म्हणजे त्याची मासिक हप्ते भरण्याची सुविधा कमी होणार. कोरोनाच्या काळात जिवंत राहू याचीच लोकांना खात्री नव्हती. त्यामुळे जेथे जगण्याची खात्री नाही तेथे ‘अपफ्रंट’ बारा महिन्यांचा प्रीमियम भरण्यास पॉलिसीधारक राजी नव्हते म्हणून ही हप्ता प्रीमियम योजना कार्यरत करण्यात आली.
याशिवाय कोरोनाच्या काळात लोकांची क्रयशक्तीही कमी झाली होती व लोकांच्या हातात एकदम वार्षिक प्रीमियम भरण्यासाठी पैसाही नव्हता. सर्व विमा कंपन्यांनी हप्त्याने प्रीमियम भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. या कंपन्या यासाठीच्या संगणक प्रणालीच्या बदलाची प्रक्रिया कार्यान्वित करीत आहेत तरीही स्टार हेल्थ अ‍ॅण्ड अलाईड इन्श्युरन्स कं. लि., केअर हेल्थ इन्श्युरन्स लि., एचडीएफसी इर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी आणि चोलामंडलम एमएम जनरल इन्श्युरन्स कं. लि. यानी हप्त्याने विमा प्रीमियम स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

आरोग्य विमा ही प्रत्येकाची गरज झालेली आहे आणि याची जाणीव प्रत्येकाला कोरोनाच्या काळात प्रकर्षाने झाली. फक्त कोरोना आजाराला संरक्षण देणार्‍या दोन पॉलिसीही सध्या उपलब्ध आहेत. बर्‍याच लोकांना मात्र ‘प्रीमियम’ची रक्कम उभारणे कठीण होते. कोरोनामुळे विमा कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचे दावे संमत केल्यामुळे, विमा कंपन्यांना प्रीमियमच्या रकमेत पाच टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे यापुढे ‘प्रीमियम’च्या रकमेत वाढ होणार आहे.
भारतीय लोकसंख्येचा विचार करता, आरोग्य विमा उतरविणार्‍यांचे प्रमाण फार कमी आहे. यात वाढ व्हावी. सध्याच्या केंद्र सरकारने अतिशय अल्प प्रीमियम रकमेच्या दोन जीवन विमा पॉलिसी कार्यरत केल्या त्या म्हणजे –
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. वार्षिक प्रीमियम फक्त रुपये बारा. या पॉलिसीत पॉलिसीधारकाचा जर, अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला रुपये २ लाख मिळू शकतात. तसेच कायमचे किंवा तात्पुरते अंपगत्व आल्यासही काही रक्कम मिळते. याशिवाय प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना ही अस्तित्वात असून, हिचा वार्षिक प्रीमियम रु. ३३०/- इतका आहे. यात मृत्यूनंतर पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला रु. २ लाख मिळतात. या जीवन विमा पॉलिसी जशा गरिबांचा विचार करून सध्याच्या केेंद्र सरकारने कार्यरत केल्या आहेत तशी आरोग्य विम्याची कमी प्रीमियमची पॉलिसी केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी आशा असंख्य भारतीय बाळगून आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -