घरफिचर्ससारांशस्वप्नपूर्तीची ‘भिडणारी’ गोष्ट- तेंडल्या...

स्वप्नपूर्तीची ‘भिडणारी’ गोष्ट- तेंडल्या…

Subscribe

नव्वदच्या दशकात क्रिकेट खेळणार्‍या क्रिकेटपटूंचे येणारे संदर्भ, भारत-पाकिस्तान मॅचचा रणसंग्राम, सचिन आऊट झाल्यावर टीव्हीला चिकटलेले ‘मुंगळे’ दूर होणं असं सारं काही या सिनेमात विस्तारानं येतं. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ‘तेंडल्या’ हा सिनेमा एक आगळीवेगळी पर्वणी आहे.

– आशिष निनगुरकर

‘बारकी गोष्ट, मोठी गोष्ट’ असं काही नसतं. ‘गोष्ट ही गोष्ट असते’, असा एक संवाद ‘तेंडल्या’ चित्रपटात गजा या पात्राच्या तोंडी आहे. चित्रपटाचे वर्णन करण्यासाठी हा अतिशय चपखल आहे. तसे पहायला गेल्यास चित्रपटाची गोष्ट अतिशय ‘बारकी’, साधी-सोपी अन् सरळ आहे, पण याच साधेपणामुळे आणि त्यातल्या सच्चेपणामुळे ही गोष्ट आपल्या काळजाला भिडते आणि ‘तेंडल्या’चा चेंडू थेट सीमापार पाठवते. चित्रपटाच्या पोस्टरवरून आणि ट्रेलरवरून सचिन तेंडुलकरवर जीव ओवाळून टाकणार्‍या लोकांवर हा चित्रपट बेतलेला असल्याचे सहज लक्षात येते. चित्रपटाची कथा त्याभोवतीच फिरेल, असा अंदाज असतो. हा अंदाज खरा आहे, मात्र हे कथेचे केवळ सूत्र आहे. ही कथा इस्लामपूर जवळील एका छोट्याशा गावात घडते. गजा आणि तेंडल्या, हे दोघे कथेचे मध्यवर्ती नायक आहेत.

- Advertisement -

सचिन जाधव, नचिकेत वाईकर दिग्दर्शित ‘तेंडल्या’ मात्र ‘सिक्सर’ ठोकण्याचं काम करतो, हे आधीच सांगायला हवं. नव्वदचं दशक, या दशकातलं क्रिकेटचं वेड, ‘मॅच’ पाहण्यासाठी करावी लागणारी कसरत, सचिन तेंडुलकरची लोकप्रियता, त्याचं अगदी शहरापासून ते खेडोपाडी पसरलेला चाहतावर्ग असे अनेकांच्या जिव्हाळ्याचे विषय इथं अस्सल गावरान तडका देऊन गुंफले आहेत. अनेक संकटांवर मात करून तयार झालेला नव्या कलाकारांचा हा प्रयत्न बघण्यासारखा आहे. सचिन तेंडुलकर या नावाचं एका पिढीवर गारुड होतं आणि आज तो खेळत नसला, तरीही त्याचे अनेक सामने, विक्रम, सामन्यांमागचे किस्से सर्वांना तोंडपाठ आहेत. सचिन खेळणार म्हटल्यावर शहरापासून ते गावात दूरवर सर्वत्र अगदी अघोषित संचारबंदी असायची. देशातील अगदी कोणत्याही भागांत हेच होतं. सिनेमाची गोष्ट नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात पश्चिम महाराष्ट्रातील एका गावात सुरू होते. अतिशय साधं असं हे गाव आहे. ‘वडाप’ चालविणारा आणि सचिन तेंडुलकरचा कट्टर फॅन असलेला गज्या (फिरोज शेख) आणि त्याच गावात राहणारा शाळेतील तेंडल्या (अमन कांबळे) या कथेतील दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा.

दोघंही सचिन तेंडुलकरचे अक्षरश: भक्त. सचिन खेळणार म्हटल्यावर ती ‘मॅच’ बघण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेले. तेंडल्याची आणि गज्याची दोघांचीही घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची. गल्लीतील पोरांबरोबर पैसे लावून मॅच लावणारा तेंडल्याला ‘एमआरएफ’ची बॅट हवी आहे आणि या बॅटनं त्याला दुसर्‍या टीमला हरवायचं आहे, तर दुसरीकडे सचिनची मॅच बघायला अनेकांचे उंबरठे झिजवून आणि मित्रांच्या हातापाया पडून गज्याही पुरता वैतागला आहे. आपल्या घरी आपला स्वत:चा कलर टीव्ही असावा आणि त्यावर आपण दिमाखात आपल्या सचिनची मॅच बघावी, हे त्याचं स्वप्न आहे, तर दुसरीकडं सचिनप्रमाणे खेळून तेंडल्याला माळरानावरची मॅच मारायची आहे. या दोघांच्या या स्वप्नांचा वेध म्हणजे ‘तेंडल्या’ हा सिनेमा. या स्वप्नपूर्तीसाठी दोघे काय काय करतात, त्यांचे कुटुंबीय, मित्र त्यांना साथ देतात का? ‘एमआरएफ’ची बॅट घेऊनही शेवटी ‘तेंडल्या’ची टीम मॅच जिंकते का, या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘तेंडल्या’ पहायला हवा.

- Advertisement -

सिनेमाचा संपूर्ण तोंडवळा ग्रामीण आहे; कारण गोष्टच गावात घडणारी आहे. त्याची भाषाही अस्सल पश्चिम महाराष्ट्राचा बाज पकडणारी आणि ठसकेबाज आहे. गावातलं राजकारण, दोन गटांमधील वाद-संघर्ष, टीव्ही असणार्‍यांचा एक वेगळाच रुबाब (आणि वेळेप्रसंगी माज) असं सारं काही लेखक-दिग्दर्शक इथं मांडू पाहतो. चित्रपटातील बहुसंख्य कलाकारांचा हा पहिलाच सिनेमा आहे; त्यामुळे त्यांचे परफॉर्मन्स अगदी अस्सल आणि मातीतले वाटतात. सिनेमासाठी ते अभिनय करत आहेत, असं काही वाटत नाही. त्यांची नावही अशी भारी आहेत. पैलवान, शिरक्या, बाबल्या, काळा संत्या, जाँट्या असली अतरंगी नावं या व्यक्तिरेखांची आहेत. गावातील टीमची नावही ‘टग्या मारुती टीम’ अशी आहेत. नव्वदच्या दशकात क्रिकेट खेळणार्‍या क्रिकेटपटूंचे येणारे संदर्भ, भारत-पाकिस्तान मॅचचा रणसंग्राम, सचिन आऊट झाल्यावर टीव्हीला चिकटलेले ‘मुंगळे’ दूर होणं असं सारं काही इथं अगदी विस्तारानं येतं. लेखक-दिग्दर्शक या कथेच्या अनुषंगानं साधाच; पण महत्त्वाचा विचार मांडतो.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना, तरुणांना स्वप्न पाहण्याची सवय सचिननं लावली. त्या स्वप्न पाहण्याचा संदर्भ इथं आहे. अगदी छोट्या छोट्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी काय काय करावं लागतं, तो विचार अधोरेखित केला जातो. हाती पैसा नसताना, असंख्य अडचणी असतानाही स्वप्नातल्या वाटणार्‍या गोष्टी साध्य करण्यासाठी काय करावं लागतं, ते अतिशय साध्या पद्धतीने सिनेमा मांडतो. गोष्टीत वेळोवेळी नाट्य आहे, ‘मेलोड्रामा’ आहे, मात्र त्याचा अतिरेक नाही. कोणतीही व्यक्तिरेखा, तिची घुसमट, आर्थिक-सामाजिक संदर्भ ‘ग्लोरिफाय’ करण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक करत नाही आणि ‘सोशल लेक्चरबाजीही’ केली जात नाही. कथानकात काही गोष्टी नीटपणे उलगडल्या जात नाहीत. गज्याला गावातील एका बड्या व्यक्तीकडून पैशासाठी तगादा लावला जात असल्याचं दाखवलं जातं, मात्र त्या मागचं नक्की कारण काय हे उलगडत नाही. काही टप्प्यावर जरा सिनेमा संथही होतो, मात्र पुन्हा गाडी ‘ट्रॅक’वर येते, मात्र, या उणिवांकडे दुर्लक्ष करायला हवं. थोडक्यात काय तर या ‘तेंडल्या’ने मैदान मारलं आहे. स्वप्नपूर्तीची ही गोष्ट ‘भिडणारी’ आहे, मात्र त्यांच्यासह अनेक उपकथानकांच्या जोडीने गोष्ट पुढे सरकत जाते.

सचिन तेंडुलकरने दिलेल्या स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीला हा चित्रपट अर्पण करण्यात आला आहे. तीच जिद्द, तीच उमेद चित्रपटभर व्यापून राहते.१९९७-९८ च्या दरम्यान घडणारी ही गोष्ट. तो काळ अगदी हुबेहुब उभा करण्यात आला आहे. गजा आणि तेंडल्या, दोघेही क्रिकेटच्या, त्यातही तेंडुलकरच्या वेडाने झपाटलेले. त्यांच्या आयुष्यात श्वासाइतका तेंडुलकर महत्त्वाचा झालेला. याच प्रेमातून दोघांचंही एक स्वप्न जन्माला येतं. तेंडुलकरचा खेळ पाहण्यासाठी इतरांच्या घरी जाऊन विनवण्या करून टीव्ही पाहण्याला वैतागलेला गजा स्वतःच्या घरी रंगीत टीव्ही घेण्याचं स्वप्न बघतो, तर तेंडुलकरसारखी ‘एमआरएफ’ची बॅट घेऊन गावातल्या पोरांना हरवण्याच्या स्वप्नाने तेंडल्याला पछाडलेलं असतं. त्यांची ही स्वप्न पूर्ण होतात का, हे चित्रपटात पाहणंच इष्ट. कथेचा शेवट अपेक्षित असला, तरी ‘मेलोड्रमा’ न करता अनपेक्षित सहजतेने होतो. त्यामुळेच शेवटी एका प्रसंगी आपसूकच आपणही पात्रांच्या आनंदात सामील होत जल्लोष करतो. ही सहजताच चित्रपटाचे बलस्थान आहे. ग्रामीण भागातील कथा खरोखर तो भाग अनुभवलेल्या लोकांनी सांगितल्यामुळे त्यात अस्सलपणा आहे. संवादातही कुठेच कृत्रिमपणा नाही. अगदी अखेरीसही पात्रांच्या तोंडून जीवनोपदेशक वाक्य टाकण्याचा मोह लेखक-दिग्दर्शकांनी टाळला, हे उत्तम. लेखकाने कथेचा योग्य वेग सांभाळला आहे आणि कॅमेर्‍यानेही सुंदर फ्रेम्स टिपल्या आहेत. दिग्दर्शक सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर यांनी पदार्पणातच कमाल केली आहे. उत्तम काही हाती लागल्यावर काय करू आणि काय नको, असे होते. यातील ‘काय नको’ हे या दोघांना पुरते उमजल्यामुळे चित्रपटाची भट्टी त्यांनी भन्नाट जमवली आहे. गजाच्या भूमिकेत असलेल्या फिरोज शेखचे काम सर्वाधिक लक्षात राहते. प्रचंड बोलक्या डोळ्यांचा आणि देहबोलीचा त्याने उत्तम वापर केला. तेंडल्याच्या भूमिकेतील अमन कांबळेची निरागसता भाव खाऊन जाते. सगळ्याच कलाकारांची कामे तोडीस तोड झाली आहेत. विशेषतः शाळकरी मुलांची कामे केलेल्या सगळ्या कलाकारांनी ‘दंगा’ केला आहे.नव्वदच्या पिढीला ‘नॉस्टॅल्जिक’ होण्याची संधी चित्रपट देतो. क्रिकेटसोबतच माहेरची साडी, बॉर्डर हे चित्रपट, अलिफ लैला, आयवाचा रंगीत टीव्ही हे सगळे संदर्भ त्या काळाच्या आठवणी ताज्या करतात, मात्र हा केवळ त्या काळाचा चित्रपट नाही, त्यातल्या जिद्दीमुळे तो सार्वकालिक आहे. हा केवळ क्रिकेटवेड्यांचा, सचिन तेंडुलकर आवडणार्‍या माणसांचा नाही, तर माणसांचे माणूसपण दाखवणारा चित्रपट आहे. त्यामुळे प्रत्येक पिढीतील माणसांनी आवर्जून पहावा, असाच आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -