उच्चभ्रू सेलिब्रिटींची आलिशान घरं आणि नर्गिस नगरसारखा झोपडपट्टी भाग असे दोन टोकांचे मतदार या मतदारसंघात मोठ्या संख्येने आहेत. मात्र, सेलिब्रिटिंपेक्षा सामान्य आणि झोपडपट्टीतील मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडत असल्यामुळे २०१४पूर्वीपर्यंत काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांच्या पारड्यात मतं जात होती. २०१४मध्ये याच सामान्य मतदाराला आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आलं. मात्र, अल्पसंख्याक आणि ख्रिश्चन समाजाच्या व्होटबँकेवर इथली गणितं कधीही फिरू शकतात. या मतदारसंघात एकूण २७४ मतदान केंद्र आहेत.
मतदारसंघ क्रमांक – १७७
मतदारसंघ आरक्षण – खुला
मतदारांची संख्या
पुरुष – १,५२,१२६
महिला – १,३४,४९५
एकूण मतदार – २,८६,६२१
विद्यमान आमदार – आशिष शेलार, भाजप
२०१४च्या निवडणुकीत विधानसभेवर जाण्याआधी आशिष शेलार विधानपरिषदेवर आमदार म्हणून पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते. मात्र, त्याचवेळी ते मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून देखील सत्ताधारी शिवसेनेला कडवी टक्कर देत होते. २०१३मध्ये त्यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाली आणि २०१४मध्ये वांद्रे पश्चिममधून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुंबईतच बालपण गेलेल्या आशिष शेलार यांनी सुरुवातीपासूनच भाजपच्या मुशीत राजकारणाचे धडे गिरवले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या आशिष शेलार यांना यंदाच्या सरकारमध्ये शेवटी शेवटी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) आशिष शेलार, भाजप – ७४,७७९
२) बाबा सिद्दीकी, काँग्रेस – ४७,८६८
३) विलास चावरी, शिवसेना – १४,१५६
४) तुषार आफळे, मनसे – ३११६
५) आसिफ भामला, राष्ट्रवादी – २३८७
नोटा – १५३५
मतदानाची टक्केवारी – ५१.२३ %